नवी दिल्ली : विधानसभा निकालाच्या तब्बल सात दिवसांनंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन 10 जनपथवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस नेते सोनिया गांधींशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याचं खंडन करत फक्त निकालाच्या विश्लेषणावर चर्चा झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांसह, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांसारखे इतर काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते.


राज्यातील एकंदरीत परिस्थितीवर पक्षाकडून कोणातीच रणनीती आखण्यात आलेली नाही. शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही फक्त राज्यातील सद्य स्थितीची माहिती दिली.  तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची सर्व माहिती आम्ही पक्षश्रेष्ठींना दिली असल्याचंही थोरात यांनी सांगितलं. राज्यातील कोणत्या मतदारसंघात काय झालं?, कोणामुळे काँग्रेसचा पराभव झाला? कोणत्या मतदारसंघात मतांचं विभाजन झालं? अशा सर्व विषयांवर सोनिया गांधींशी चर्चा झाली असल्याचे थोरात यांनी सांगितलं.

दरम्यान आज (शुक्रवार) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते. पण त्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. मात्र काँग्रेसने अद्याप याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहिर केलेली नाही.

Maharashtra Politics | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार : सूत्र | ABP Majha



अशातच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. या भेटीदरम्यान शिवसेनेबाबतच्या भूमिकेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.