आझमगड (उत्तर प्रदेश) : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशच्या आझमगडच्या सीमेवर रोखून ताब्यात घेण्यात आलं. डॉ. राऊत हे आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. डॉ. राऊत यांनी स्वत: ट्वीट करत ही महिती दिली आहे.


डॉ. नितीन राऊत हे आझमगड सीमेवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. आपल्याला बांसा इथे जायचं आहे, असं राऊतांनी पोलिसांना सांगितलं. परंतु बांसामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं. यानंतर आझमगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि सर्किट हाऊस इथे नेलं.








काय आहे प्रकरण?
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशच्या आझमगडच्या बांसा गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी नितीन राऊत जात होते.


नितीन राऊत आझमगडला जाण्याचं कारण काय?
काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी या प्रकरणाचं सत्य पडताळण्यासाठी एक सत्य-शोध समिती गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये नितीन राऊत यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस खासदार पीएल पुनिया हे देखील नितीन राऊत यांच्यासोबत उपस्थित राहणार होते.


अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ राऊत यांनी देशभरात दलितांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा विभाग पीडितांसाठी मदतीसाठी तत्परतेने काम करत आहे. तसंच त्यांना तात्काळ न्याय मिळेस यासाठीही काम करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणाच्या सत्य-शोध समितीमध्ये सामील करण्यात आलं आहे.


सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या माहितीनुसार, अनुसूचित जाती-जमातींवरील गुन्ह्यांमध्ये, बलात्कार, हत्या, हिंसा आणि जमिनीशी संबंधित गुन्ह्यात उत्तर प्रदेश वरच्या स्थानावर आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती-जमातीविरोधातील गुन्ह्यांमध्ये 2014 ते 2018 दरम्यान 47 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. यानंतर गुजरातमध्ये 26 टक्के, हरियाणामध्ये 15 टक्के, मध्य प्रदेशात 14 टक्के आणि महाराष्ट्रात 11 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


Nitin Raut | मंत्री नितीन राऊत यांना आझमगड सीमेवर यूपी सरकारनं रोखलं