रांची: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पाय आणखीच खोलात गेला आहे.  लालूंना चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा तर 30-30 लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला.


जर लालू यादव यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेत एका वर्षाची वाढ करण्यात येणार आहे.

लालू यादव यांना दोन कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.. दोन्ही कलमांतर्गत लालू यादव यांना प्रत्येकी  ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत.

याशिवाय लालू यादवांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली. रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टानं लालू यादव यांना दोषी घोषित केलं.

यापूर्वीच्या तीन खटल्यात सुनावलेल्या शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. मात्र चौथ्या खटल्यातील शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत.  शिवाय दंडाची रक्कमही वेगवेगळी म्हणजेच 30-30 लाख अर्थात 60 लाख रुपये आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज शिक्षेची सुनावणी करण्यात आली. मात्र लालू सध्या रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याने, ते या सुनावणीला हजर नव्हते. त्यांना लवकरच दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

लालू यादव आतापर्यंत 6 पैकी 4 खटल्यात दोषी आढळले आहेत, तर दोन खटल्याचीं सुनावणी सुरु आहे.

19 मार्चला कोर्टाने 31 पैकी 19 आरोपींना दोषी धरलं होतं. ज्यात लालूंचाही समावेश होता.

वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे?

चारा घोटाळा काय आहे?

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला.

चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले.

1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात

चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता.

या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत.

आरोपी कोण आहेत?

चारा घोटाळ्यात एकूण 38 आरोपी होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मंत्री विद्यासगर निषाद, पीएसीचे तत्कालनी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत, आर. के. राणा, तीन आयएएस अधिकारी, फूलचंद सिंह, बेक ज्युलिएस उर्फ महेश प्रसाद, एस के भट्टाचार्य, पशू चिकित्सक डॉ. के. के. प्रसाद आणि इतर चार आरोपींचा समावेश होता.

यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तिघेजण सीबीआयचे साक्षीदार बनले आणि आपला गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर त्या तिघांनाही 2006-07 मध्ये शिक्षा सुनावली गेली. त्यामुळे आता एकूण 22 आरोपींविरोधात रांची कोर्टात निर्णय दिला जाणार आहे.

चारा घोटाळ्याचा घटनाक्रम

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.

  • 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.



  • 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.

  • 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

  • 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.

  • 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.

  • 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.

  • मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

  • 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.


संबंधित बातम्या

चारा घोटाळा नेमका काय आहे?