आगरतळा : त्रिपुरामध्ये सत्ता बदलण्यासोबतच, आणखी बदलही दिसायला लागले आहेत. त्रिपुरा विधानसभेत शुक्रवारी पहिल्यांदाच राष्ट्रगीताचे सूर ऐकायला मिळाले.


सभागृहाच्या पहिल्या सत्राची सुरुवात अध्यक्ष रेबती मोहन दास यांच्या निवडणुकीने झाली. कामकाज सुरु होण्याआधी सगळे आमदार सभागृहात 11 वाजता पोहोचल्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाली. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्व मंत्री, सभागृहाचे सदस्य, अधिकारी, पत्रकार आणि प्रेक्षक उभे राहिले.

विधानसभेत राष्ट्रगीत लावण्याची ही पहिलीच वेळ होती. "प्रत्येक दिवशी राष्ट्रगीत लावण्याचा प्रयत्न करेन," असं सभागृहाचे सचिव बामदेव मजुमदार यांनी सांगितलं. "दुसऱ्या कोणत्या सभागृहात राष्ट्रगीत लावलं जातं की नाही, याबाबत मला कल्पना नाही," असंही मजुमदार म्हणाले.

"तर राष्ट्रगीत लावण्याआधी विरोधकांसोबत चर्चा केली नव्हती," असं सीपीएमचे आमदार बादल चौधरी म्हणाले.

त्रिपुरात भाजपला स्पष्ट बहुमत
डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने मोठं यश मिळवलं. गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांचा पराभव करत भाजपने त्रिपुरामध्ये बहुमत मिळवलं आहे. 60 जागा असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षाने 43 जागांवर विजय मिळवला, तर दोन जागांवर आघाडी आहे. सीपीएमला केवळ 16 जागांवर विजय मिळाला.

संबंधित बातम्या

ईशान्य भारतात मोदी लाट, त्रिपुरात भाजप, मेघालयमध्ये त्रिशंकू

वय-अनुभवाचा मान, त्रिपुरा भाजप अध्यक्ष माणिक सरकारांच्या पाया पडले!

त्रिपुरामध्ये आज विप्लव देब यांचा शपथविधी