Lakhimpur Kheri Incident : उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी घटनेत आठ जणांचा बळी गेल्याच्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टानं सुरू केली आहे.  लखीमपूर खेरी जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सुरू केली आहे. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे.  सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. या प्रकरणाचे टायटल Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हेही खंडपीठाचे सदस्य आहेत.


लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक, अजय मिश्रा यांच्या मूळ गावी दंगलचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.



शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे आयोजन केले होते. शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला. या संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की पोलीस आरोपींना अटक न करता त्यांचे संरक्षण करत आहेत. त्यांची मागणी आहे की, पीएम मोदींनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना हटवावे. 



आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.