तिरुअनंतपूरमकेरळमध्ये पावसाने उसंत घेतल्याने, हळूहळू पूर ओसरु लागला आहे. पण पूर ओसरल्यानंतरच्या नुकसानाची दाहकता महाभयंकर आहे. पुरात आतापर्यंत 370 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाख 24 हजार 649 जणांना पुनर्वसन शिबीरात हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्तांसाठी केरळमध्ये 5,645 मदत आणि पुनर्वसन केंद्र उभारली आहेत.


प्रशासनानं 14 जिल्ह्यांत दिलेला रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. दरम्यान केंद्राची परवानगी मिळवल्यानंतर आजपासून कोच्चीच्या नेवी बेसवरून पॅसेंजर फ्लाईट उड्डाण घेऊ शकणार आहेत. 26 ऑगस्टपर्यंत कोच्ची एअरपोर्ट बंद ठेवण्यात आलं होतं.

पेट्रोल-डिझेलसाठी रांगा

पूर ओसरु लागल्यानंतर केरळात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पदककुडी गावात महामार्गालागत सुरू असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर भल्या मोठया रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनं बंद अवस्थेत असल्यानं शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत. तर बऱ्याच पुलांवर मोठी झाडं, टीव्ही, फ्रिज अश्या अनेक गोष्टी वाहून आलेल्या आहेत. केरळातल्या पुरात आत्तापर्यंत 370 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.

पावसाची उसंत

केरळमध्ये दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. पुढील चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



1924 नंतर पहिला मोठा पूर

मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी केरळच्या प्रलयाबाबत माध्यमांना माहिती दिली. 1924 नंतर केरळमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा पूर आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुरात अडकलेल्या लोकांची जीव वाचवण्याला आमचं प्राधान्य आहे. महापुराचा प्रलय आता थांबेल असं दिसतंय. पाणी ओसरु लागलं आहे. राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रकारची मदत स्वीकारत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.  

20 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान : पिनराई विजयन

अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत 20 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. केरळमध्ये एनडीआरएफच्या 169 टीम काम करत आहेत. 22 हेलिकॉप्टर, नेव्हीच्या 40 बोटी, कोस्ट गार्डच्या 35 बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या शिवाय स्थानिक तरुण, पोलीस आणि मच्छिमारांचीही मदत मिळत आहे.

आजवरचं सर्वात मोठं बचावकार्य


एडीआरएफची टीमतर्फे युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफने विविध भागातून जवळपास 10 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पूरग्रस्थांच्या मदतीसाठी वायूसेनाही दिवसरात्र तैनात आहे. गरजूंपर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तूही पुरवण्याचं काम वायूसेनेकडून केलं जात आहे. एनडीआरएफच्या 50 टीम केरळात बचावकार्य करत आहे. जवळपास सव्वा तीन लाख नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. देशभरातील आजवरचं सर्वात मोठं बचाव कार्य असल्याचं एनडीआरएफने म्हटलं आहे.


महाराष्ट्राकडून 20 कोटींचे अर्थसहाय्य


केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून 20 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. त्यानंतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली आहे. त्यात अन्न पाकिटेदूध पावडरब्लँकेटबेडशीट्सकपडेसाबणसॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींचा समावेश असूनकेरळ सरकारने मागितलेल्या निकडीच्या बाबी यात प्राधान्याने पाठविण्यात येत आहेत.


महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे 6.5 टन मदतसामग्री शनिवारी सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर, रविवारी राज्य सरकारतर्फे आणखी 30 टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायूदलाच्या विमानाने रविवारी दुपारी चारला मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेतले. याशिवायआणखी 5 टन मदतसामग्री  आज पाठविण्यात येणार आहे.


महाराष्ट्राचे मंत्री 110 डॉक्टरांसह केरळात

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आज केरळला जाणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील 110 डॉक्टरांची टीम देखील जाणार आहे. राज्यातील औषध कंपन्यांनी देखील हवी तेवढी औषधे उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली आहे. तर रेमंड कंपनीने पुरग्रस्तांना पाच ट्रक ब्लँकेट देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान मदतीसाठी मुंबईतील गणेश मंडळंही देणगीतील काही रक्कम देणार आहेत.

केंद्र सरकारकडून 500 कोटींची मदत
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत मोदींची बैठक पार पडली.


पूरग्रस्तांना विविध राज्यातून मदत
महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत.


केरळमधील जलप्रलयानंतर आता आजारांचा धोका 


केरळमधील भीषण पूरस्थिती आता हळूहळू आटोक्यात येत आहे. यानंतर आणखी एका गोष्टीची भीती निर्माण झाली आहे. साडे तीनशेपेक्षा जास्त जीव घेतलेल्या पावसामुळे आता संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही बचावकार्य सुरु आहे. अनेकांचे जीव वाचवण्यात तीनही दल आणि एनडीआरएफला यश आलं आहे.


नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून याठिकाणी नागरिकांना काही आजार झाल्याचं समोर आलं आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना पुरेसे अन्न आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आता या ठिकाणहून तीन जणांना कांजिण्यांचा संसर्ग झाल्याने वेगळं ठेवण्यात आलं असल्याची माहिती आहे. प्रदूषित पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी आहे. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.






संबंधित बातम्या  

केरळ महापूर : मृतांची संख्या 357 वर 


केरळसाठी केंद्राकडून 500 कोटींची मदत


VIDEO : केरळ पूर : गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं!


केरळच्या मदतीला इतर राज्य धावले, मोदीही केरळात पोहोचले 


काँग्रेसचे आमदार-खासदार केरळसाठी एक महिन्याचं वेतन देणार