करुणानिधी यांचं निधन चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कडगम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला. कोर्टाने तामिळनाडू सरकार आणि डीएमकेच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून, अखेर करुणानिधींच्या समाधीला मरीना बीचवर जागा देण्याचे आदेश दिले.


करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत पोहोचत आहेत.

अंत्यसंस्काराच्या जागेवरुन वाद

दरम्यान, करुणानिधी यांच्या पार्थिवावर नेमके कुठे अंत्यसंस्कार होणार, याबाबत वाद सुरु होता. राज्य सरकारने मरीना बीचवर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे डीएमकेच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

करुणानिधी यांच्या समाधीसाठी तामिळनाडू सरकारने दुसरी जागा देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र डीएमकेने मरीना बीचचीच मागणी केली.

त्यामुळे याबाबत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. रात्री याबाबत सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकारने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे कोर्टाने आज सकाळी आठची वेळ दिली.

कोर्टात काय झालं?

10.15 AM :करुणानिधींची समाधी मरीना बीचवरच होणार, दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर मद्रास हायकोर्टाचा निर्णय  

10.10 AM: सरकारी वकील: “कोर्ट कोणत्याही भावनेच्या आधारे आदेश/निर्णय देत नाही. नियम-कायदे पाहूनच निर्णय होतात. त्यामुळे या याचिकेला कशाचाच आधार नाही. हा केवळ समाधीचा मुद्दा नाही. एकदा इथे समाधी झाली की त्यानंतर स्मारकाची मागणी होईल”

10.02 AM: सरकारी वकील म्हणाले, “कोणी पदावर असतं, तर कोणी एखादं पद भूषवलेलं असतं. सर्वांसाठी वेगवेगळे प्रोटोकॉल असतात. याप्रकरणात आम्ही परंपरेचं पालन करत आहोत. ती परंपरा जी स्वत: करुणानिधी यांनीच ठरवली होती. त्यांच्या कार्यकाळात तीन माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांना मरीना बीचवर जागा मिळाली नव्हती”.

आम्ही त्यांचा अपमान करतोय असं नाही. उलट आम्ही तर त्यांनी ठरवलेले नियम आणि आदेशांचं पालन करतोय. याचिकाकर्तेच करुणानिधींच्या नियमांचं उल्लंघन करुन अपमान करत आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

9.53 AM: सरकारी वकील म्हणाले, “1975 मध्ये के कामराज यांनाही मरीना बीचवर जागा दिली नव्हती. तो आदेश स्वत: करुणानिधींनीच दिला होता. कामराज मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे करुणानिधींनी तसा आदेश दिला होता. 1996 मध्ये जानकी रामचंद्रन या माजी मुख्यमंत्र्यांनाही मरीना बीचवर जागा मिळाली नाही. तो आदेशही करुणानिधींनी दिला होता. त्यामुळे हे प्रकरण समानतेच्या आधारे पाहायला हवं”.

9.11AM: डीएमके वकिलांनी युक्तीवाद करताना, “एम जी रामचंद्रन यांना अण्णादुराई यांच्या समाधीजवळ जागा देण्यात आली होती. कारण ते त्यांच्या विचारधारेचे होते. जयललिता यांनाही मरीना बीचवर जागा मिळाली, कारण त्या एमजी रामचंद्रन यांच्या अनुयायी होत्या. करुणानिधीही अण्णादुराई यांना फॉलो करत होते. त्यामुळे त्यांना तिथे जागा का मिळू नये?”, असं कोर्टात नमूद केलं.

कलम 21 चं पालन करत, करुणानिधी यांना मरीना बीचवर जागा मिळायला हवी. आम्ही तिथे इमारत बांधा म्हणत नाही, तिथे केवळ आम्ही समाधी बांधण्याची मागणी करत आहोत, असाही युक्तीवाद डीएमकेच्या वकिलांनी केला.

8.30 AM : सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. यापूर्वी ज्या 3 जणांच्या समाधीसाठी मरीना बीचवर जागा देण्यात आली, ते तीनही राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री होते. मात्र करुणानिधी सध्या मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे मरीना बीचवर त्यांच्या समाधीसाठी जागा देता येणार नाही.

8.15 AM: मरीना बीचवर करुणानिधी यांच्या समाधीस्थळासंदर्भात मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरु. मरीना बीचवर करुणानिधींची समाधी व्हावी अशी मागणी डीएमकेची आहे. मात्र राज्य सरकारने त्याला परवानगी दिली नाही.

डीएमके समर्थकांचा गोंधळ

एम करुणानिधींच्या अंत्यसंस्कारासाठी कुठली जागा द्यायची  यावरुन मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरु होती. अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठी चेन्नईतील मरीना बीचवरील जागेची मागणी केली. तर अण्णा द्रमुकच्या सरकारनं जागा देण्यास नकार दिल्यामुळे या वादावर मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरु झाली . दरम्यान, राज्य सरकारनं जागा देण्यास नकार दिल्यानं करुणानिधींच्या समर्थकांनी कावेरी रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ केला. तर काहींनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेटसही तोडले. त्यामुळे जमावाला  पांगवण्यासाठी पोलिसांना समर्थकांवर सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

थिएटर, दारु दुकाने बंद

करुणानिधींच्या निधनाने तामिळनाडू शोकसागरात बुडालं आहे. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. तामिळनाडूतील सर्व दारु दुकाने आणि थिएटर्स बंद करण्यात आली आहेत.

प्राणज्योत मालवली

करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.

करुणानिधी यांना 28 जुलै रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच आज संध्याकाळी 6.10 वाजता कावेरी रुग्णालयात करुणानिधींनी अखेरचा श्वास घेतला.

कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी पत्रक काढून, करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली.

दरम्यान, करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळनाडू सरकारने एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला असून, आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे.

सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास

चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे.

चित्रपटातून राजकारणाकडे वळण्याचा ट्रेण्ड दक्षिण भारतात जुना आहे. करुणानिधी यांनी तामिळ मनोरंजनविश्वात नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. करुणानिधींच्या चाहत्यांनी त्यांना 'कलैनर' हे नाव बहाल केलं आहे. कलैनर म्हणजे तामिळ भाषेत कलेतील विद्वान.

करुणानिधी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत, तर बारा वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. भारतीय राजकारणात करुणानिधी यांना अनन्यसाधारण स्थान आहे.

बालवयात राजकारणात प्रवेश

करुणानिधी यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. दक्षिण भारतातील हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. 1937 मध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.

करुणानिधी यांनी तामिळ भाषेतच नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेवरील त्यांचं प्रभुत्व पाहून सामाजिक नेते पेरियार आणि द्रमुकचे तत्कालीन प्रमुख अन्नादुराई यांनी त्यांना 'कुदियारासु' वाहिनीचे संपादक केलं.

पेरियार आणि अन्नादुराई यांच्यात मतभेद झाल्यानंतर करुणानिधी अन्नादुराई यांच्यासोबत गेले. त्यानंतर करुणानिधींना मागे वळून पहावं लागलं नाही.

नेहरु पंतप्रधान असताना पहिल्यांदा आमदार

तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथालाई विधानसभा क्षेत्रातून करुणानिधी 1957 साली पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते.

करुणानिधी 1961 मध्ये द्रमुकचे कोषाध्यक्ष झाले. 1962 मध्ये ते तामिळनाडू विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेते झाले. 1967 मध्ये द्रमुक सत्तेत येताच त्यांना सार्वजनिक कार्यमंत्री झाले.

द्रमुकची धुरा

करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचं निधन झाल्यावर पक्षाचं नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आलं.

करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी तिसऱ्यांदा (1989) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव गांधी पीएम होते. चौथ्यांदा (1996) करुणानिधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा नरसिम्हा राव पंतप्रधानपदी होते. पाचव्यांदा (2006) करुणानिधींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा देशाची धुरा मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर होती.

कौटुंबिक जीवन

करुणानिधी यांचं तीन वेळा लग्न झालं. त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचं निधन झालं. एमके मुथू हे त्यांचे सुपुत्र. दुसरी पत्नी दयालु अम्माल यांच्यापासून एमके अलागिरी, एमके स्टॅलिन, एमके तमिलरासू हे पुत्र आणि सेल्वी ही कन्या आहे. तिसरी पत्नी रजति अम्मालपासून कनिमोळी ही कन्या आहे.

दिग्गजांकडून करुणानिधी यांना श्रद्धांजली

"करुणानिधी यांच्या निधनाने दु:ख झालं. ते भारतातील ज्येष्ठ नेते होते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांच्या रुपाने विचारवंत आणि लेखकही आपण गमावला. जनकल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं.", अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस आहे. कारण ज्यांना मी कधीच विसरु शकत नाही, अशा करुणानिधी यांचं आज निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो.", अशा भावना अभिनेते रजनीकांत यांनी व्यक्त केल्या.

“डीएमकेचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचं निधन झाल्याचं कळल्यावर खूप दु:ख झालं. जनतेतून आलेले नेते म्हणून त्यांची कायमच आठवण राहील. करुणानिधी यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे”, अशा भावना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या

सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास  

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन