कर्नाटकात 224 पैकी 222 जागांवर निवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 112 आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडलं होतं. यंदा 72.13 टक्के मतदान झाल्यामुळे कर्नाटकचा गड काँग्रेस राखणार की भाजप सत्ता काबीज करणार हे काही क्षणात स्पष्ट होईल.
एबीपी माझावर या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून पाहू शकता. यामध्ये सुपरफास्ट निकालासोबत तज्ज्ञांचं विश्लेषणही असणार आहे.
* राहुल गांधींसमोर आव्हान
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक मोठं आव्हान असणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता असल्याने तीही राखण्याचं आव्हान राहुल यांच्यासमोर आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.
तर भाजपने बी एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला 2008 साली सत्ता मिळवून दिली होती.
* त्रिशंकू परिस्थिती
मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकरच्या भूमिका निभावू शकतो.
एबीपी-सीव्होटरचा एक्झिट पोल
एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं समोर आलं होतं. मात्र, बहुमतापासून दूर आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या अंतिम एक्झिट पोलमध्ये भाजपला सरासरी 110, काँग्रेसला 88, जेडीएसला 24 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये बहुमतासाठी भाजपला केवळ दोन जागा कमी पडत आहेत.
इंडिया टुडे- अॅक्सिस : या एक्झिट पोलनुसार, भाजप 85, काँग्रेस 112, जेडीएस 26 आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाऊ आणि चाणक्य : या एक्झिट पोलमध्ये भाजपला 120 जागांसह बहुमत मिळताना दिसत आहे, तर काँग्रेस 73, जेडीएस 26 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत.
न्यूज एक्स आणि सीएनएक्स : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 106, काँग्रेसला 75, जेडीएसला 37 आणि इतरांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.
न्यूज नेशन आणि प्रबोधन : या एक्झिट पोलनुसार भाजपला 107, काँग्रेसला 73, जेडीएसला 38 आणि इतरांना चार जागा मिळताना दिसत आहेत.
इंडिया टीव्ही-व्हीएमआर : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 86, काँग्रेसला 96, जेडीएसला 35 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत.
रिपब्लिक टीव्ही-जन की बात : या एक्झिट पोलनुसार भाजपला 104, काँग्रेसला 77, जेडीएसला 37 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.
* सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी
सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी काढली तर भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. भाजप 102, काँग्रेस 85, जेडीएस 32 आणि इतरांना तीन असं चित्र दिसत आहे.
* 2013चं पक्षीय बलाबल
एकूण जागा 224
काँग्रेस 122 जागा
भाजप 40 जागा
जेडीएस 40 जागा
अपक्ष आणि इतर 22 जागा
* कर्नाटकमधील विभागनिहाय राजकीय समीकरणं
बॉम्बे कर्नाटक (50/224) : बॉम्बे-कर्नाटक हा भाग लिंगायत समाजाचा गड मानला जातो. 2013 मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात, सर्वाधिक वाटा या भागाचा होता. या भागातील 50 जागांपैकी 2013 साली काँग्रेसने 31 जागांवर विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत येडीयुरप्पा यांची कर्नाटक जनता पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिरंगी लढत होती. येडीयुरप्पा हे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. त्यामुळे गेल्यावेळी लिंगायत समाजाची मतं तिन भागात विभागली गेली आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
आता येडीयुरप्पा भाजपमध्ये परतले आहेत. त्यामुळे इथे यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असणार आहे. लिंगायतांची मतं आपल्याला मिळतील, अशी आशा भाजपला आहे. मात्र, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्याने, त्यांची मतं आपल्याला मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे.
या भागात बेळगाव, हुबली-धारवाड, बागलकोट, विजयपुरा आणि गदग जिल्हे येतात. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महदायी नदीतून गोव्याला पाणी न सोडणं, ऊसाचे दर इत्यादी मुद्दे कायम चर्चेत असतात.
मध्य कर्नाटक (26/224) : मध्य कर्नाटकात शिवमोगा, चित्रदुर्गा, दावणगेरे आणि चिक्कमगलुरु असे चार जिल्हे येतात. मध्य कर्नाटक हा येडीयुरप्पा यांचा गड मानला जातो. मात्र इथेही यावेळी तिरंगी लढत असेल. भाजप, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्य टक्कर असणार आहे.
2013 साली भाजप आणि येडीयुरप्पा यांच्यातील दुफळीमुळे मतं विभागली गेल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. त्यामुळे यंदा इथे भाजपच्या आशा वाढल्या आहेत. स्वत: येडीयुरप्पा हे शिवमोगातील शिकारीपुरा येथून रणांगणात आहेत. या भागात मठांची संख्याही मोठी आहे. अमित शाह आणि राहुल गांधी यांनी प्रचाराच्या काळात इथे अनेक फेऱ्या मारल्या. दलित आणि लिंगायत समाजाची संख्या या भागात तुलनेने मोठी आहे.
बंगळुरु (28/224) : बंगळुरु हा शहरी भाग आहे. शहरी भागात भाजप वरचढ आहे. जातीच्या राजकारणापलिकडचे मुद्दे शहरांमध्ये आहेत. 224 पैकी 28 जागा या भागात येतात. याच भागात सिद्धरमय्या सरकारविरोधात लाट दिसून येते.
विकास हा मुद्दा इथे महत्त्वाचा असून, रस्त्यांचा मुद्दा तर कायम ऐरणीवर असतो. त्यामुळे विद्यमान काँग्रेस सरकारवर इथल्या जनतेचा राग आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या गरिबांना आपलंसं करण्यासाठी सिद्धरमय्या सरकारने ‘इंदिरा कॅन्टिन’ची योजना आणली. तसेच, हिंदीविरोधी आणि प्रो-कन्नडा कार्ड हे मुद्देही सिद्धरमय्यांनी इथे आणले.
हैदराबाद कर्नाटक (40/224) : कर्नाटकातील हा भाग अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. बल्लारी, कोपल, यादगीर, कलबुर्गी आणि रायचूर जिल्हे या भागात येतात. अल्पसंख्यांक, एससी आणि एसटी समाज बहुतांश असलेल्या या भागात लिंगायत समाजाची संख्याही लक्षणीय आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात 2008 साली रेड्डी बंधूंनी भाजपचा प्रसार करण्यास मदत केली.
मायनिंग घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या नातेवाईकांना या भागात भाजपने सात तिकीटं देण्यात आली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेड्डी यांना प्रचारासाठी बेल्लारीमध्ये प्रवेश करता आला नाही, मात्र चित्रदुर्गाच्या फार्म हाऊसमधूनच त्यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली. रेड्डी बंधूंमुळे आपल्याला फायदा होईल, असे इथे भाजपला वाटत आहेत. तिकडे, काँग्रेसलच्या मल्लिकार्जुन खरगेंनी या भागात आपल्याच बाजूने इथली जनाता कौल देईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
ओल्ड म्हैसूर (61/224) : ओल्ड म्हैसूर भागात भाजप कमकुवत आहे. या भागात वोक्कालिगा समूहाचं वर्चस्व आहे. वोक्कालिगा समूह हा जेडीएस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे या भागात जेडीएसचं पारडं जड आहे.
मंड्या, म्हैसूर, चिक्कबलापूर, चामराजनगर, हासन, टुमकुर, बंगळुरु ग्रामीण, रामनगरा, कोलार, कोडागु असे एकूण 10 जिल्हे ओल्ड म्हैसूरमध्ये येतात. वोक्कालिगा समूह जेडीएससोबत जाणार हे गृहित धरुन काँग्रेसने ‘AHINDA’ (अल्पसंख्यांक, हिंदू आणि दलित) हा फॉर्म्युला या भागात वापरला आहे.
मंड्या आणि म्हैसूरमध्ये कावेरीचा मुद्दा कायमच चर्चेचा राहिला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावर मौन बाळगणं पसंत केले आहे. त्यात जेडीएस पक्ष भाजपची बी-टीम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते एस. एम. कृष्णा हे भाजपमध्ये आल्याने आपल्याला फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे.
कोस्टल कर्नाटक (19/224) : हिंदुत्त्व कार्ड, भाजप, आरएसस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि धार्मिक तेढ अशा गोष्टींमुळे हा परिसर कायमच चर्चेत असतो. भाजपने हेच मुद्दे प्रचारादरम्यान अजेंड्यावर ठेवली होती. इथे छोटासा वाद सुद्धा दंगलीत परावर्तित होतो. 2013 साली या भागात भाजपने 19 पैकी 13 जागा जिंक्या होत्या. त्यामुळे हिंदुत्त्व, बीफ बॅन, टीपू सुलतान जयंती, कार्यकर्त्यांच्या हत्या यांसारख्या मुद्द्यांमुळे भाजपला विजयाची आशा आहे, तर अल्पसंख्यांक मतांचा आपल्याला फायदा होईल, या आशेवर काँग्रेस आहे.
संबंधित बातम्या
मोदी धमकावत आहेत, मनमोहन सिंहांचं राष्ट्रपतींना पत्र
कर्नाटक निवडणुकीनंतर झटका, पेट्रोल-डिझेल महागलं
कर्नाटक : भाजपची एक्झिट पोलमध्ये बाजी, मात्र बहुमतापासून दूर
दलितासाठी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार, काँग्रेसचं 'जेडीएस कार्ड'?
कर्नाटक विधानसभा : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल फक्त एका क्लिकवर
कर्नाटक एक्झिट पोल : भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसची पिछेहाट
स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकमधील विभागनिहाय राजकीय समीकरणं
कर्नाटक विधानसभेसाठी मतदान, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला