नवी दिल्ली : आज कारगील विजय दिवस. कारगील विजयाला आज 20 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सध्या देशात चीनविरोधी वातावरण असताना आपण 26 कारगिल विजय दिवस साजरा करतोय.  1999 मध्ये पाकिस्तानच्या कुटिल मनसुब्यांवर मात करत त्यांना रणभूमीवर भारतीय सैन्याने धूळ चारली होती. या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धाबाबत ज्या अभिमानाने आपण बोलतो, त्या युद्धातील खरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा. 1999 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शत्रूशी लढताना कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं, पण त्यांनी कारगील युध्दात जी अतुलनीय कामगीरी बजावली ती समस्त देशवासियांचा उर अभिमानाने भरवणारीच आहे.


कॅप्टन बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला होता. त्यांनी 6 डिसेंबर 1997 रोजी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली होती. भारतीय सैन्यातील जम्मू आणि काश्मीर 13 व्या बटालियनमधून ते देशसेवा करत होते.

कारगिल युद्धाच्या काळात सर्वात कठीण टोलिंग पर्वत रांग आणि 4875 पॉईंट ताब्यात घेण्यात कॅप्टन बत्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. कारगिल युद्धातील सर्वात महत्वाच्या लढायांपैकी एक या लढाया होता. कॅप्टन बत्रा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य त्यांचा 'शेर शाह' असा उल्लेख करतात.

आठवण वीर योद्ध्याची; कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा थरकाप उडवणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा

लेफ्टनंट विक्रम बत्रा यांनी हम्प आणि रॉक नाब शिखरांवर ताबा मिळवून शत्रूच्या सैनांवर मोठा आघात केला होता. विक्रम बत्रा यांच्या या पराक्रमासाठी त्यांना पदोन्नती देत कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पदोन्नतीनंतर विक्रम बत्रा यांनी श्रीनगर-लेह मार्गाजवळचा 5140 पॉईंट शत्रूच्या ताब्यातून मुक्त केला होता. विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता. पॉईंट 5140 वर ताबा मिळवल्यानंतर टीव्हीवर 'ये दिल मांगे मोर' म्हणत त्यांनी संपूर्ण भारतीयांचं मन जिंकल होतं.

पॉईंट 5140 वर यशस्वीरित्या ताबा मिळवल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर 4875 पॉईंटवर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट अनुज नैय्यर आणि लेफ्टनंट नवीन यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कामगिरीवर निघाले. 4875 पॉईंट समुद्र सपाटीपासून 17 हजार फुट उंचीवर आहे. लेफ्टनंट अनुज नैय्यर यांच्या मदतीने विक्रम बत्रा यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. मात्र त्याच वेळी लेफ्टनंट नवीन यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. आपल्या सहकाऱ्यावर हल्ला झालेला पाहून विक्रम बत्रा स्वत: नवीन यांच्या समोर ढाल बनून उभे राहिले. मात्र यावेळी शत्रूची एक गोळी त्यांच्या छातीत लागली. हाच तो 7 जुलै 1999 चा दिवस होता ज्यावेळी अवघ्या 24 वर्षांचे कॅप्टन विक्रम बत्रा देशासाठी शहीद झाले.