Communal Violence in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात शुक्रवारी नमाजनंतर कानपूरच्या अनेक भागात हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन गटांकडून दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक केली आहे. हिंसाचार झाला त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरमध्ये उपस्थित होते.


कानपूरच्या परेड स्क्वेअरवर भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील काही लोकांकडून दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वाद निर्माण झाला आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सध्या येथील परिस्थिती सामान्य असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.


मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केली नाराजी
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेणारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री योगींच्या आदेशानंतर आता पोलीस विभागाने आरोपींवर कारवाईची तयारी सुरू केली असून त्यांची मालमत्ता जप्त करून ती पाडण्याची तयारी सुरू केली आहे. 


2017 मध्ये उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून या आधी राज्यात एकही दंगल झाली नव्हती, असं योगी यांचं म्हणणं आहे. अशा वेळी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी यांच्या उपस्थितीत होणारा हिंसाचार राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. 


योगींच्या राजवटीतील हिंसाचारांची प्रकरण
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी राज्यात वर्षानुवर्षे हिंसाचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. अहवालात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCB) च्या आकडेवारीनुसार, योगी यांच्या कार्यकाळात 2017 मध्ये 8900, 2018 मध्ये 8908, 2019 मध्ये 5714 आणि 2020 मध्ये 6126 जातीय हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या