नवी दिल्ली: झारखंड विद्युत मंडळाने भोंगळ कारभाराचं शिखर गाठलं आहे. कारण त्यांनी एका कुटुंबाला 100-200 कोटी नव्हे तर तब्बल 3800 कोटी रुपयांचं वीज बिल पाठवलं आहे.


जमशेदपूरमध्ये राहणाऱ्या बी आर गुहा यांना हे बिल मिळालं आहे. तब्बल 3800 कोटी रुपये थकल्याचं बिल त्यांना देण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर महामंडळाने त्यांच्या घराचा वीजपुरवठाही खंडित केला आहे.

एवढं वीजबिल पाहून गुहा यांना धक्काच बसला. गुहा म्हणाले, “आमचं तीन खोल्यांचं घर आहे. त्या तीन खोल्यात एक-एक फॅन आणि एक -एक ट्यूबलाईट आहे. घरात एकच टीव्ही आहे. तरीही इतकं बिल आल्याने मला धक्का बसला.”

दुसरीकडे गुहा यांच्या मुलीने वीज महामंडळावर संताप व्यक्त केला आहे. "माझ्या आईला मधुमेह तर वडिलांना रक्तदाबाचा त्रास आहे. इतकं बिल पाहून त्यांना धक्का बसला आहे. आम्ही झारखंड विद्युत बोर्डाकडे तक्रार केली आहे", असं रत्ना यांनी सांगितलं.

झारखंडमध्ये राज्य विद्युत बोर्डाने स्पॉट बिलिंग प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे वेळेत वीज बिलं मिळतील, तसंच यामध्ये त्रुटी राहणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. मात्र चारच महिन्यात यातील भल्या मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. एक-दोन नव्हे तर 45 हजार ग्राहकांच्या वीजबिलात त्रुटी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.