पाटणा: देशभरात रेल्वे तिकीट समान आहेत, तर वीज दर का नाहीत, असा सवाल करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, ‘एक देश, एक वीज दर’ची मागणी केली आहे.


मात्र वीजेच्या वहनाचा (ट्रान्समिशन) दर हा विद्युत निर्मिती केंद्रापासून वेगवेगळा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे देशभरात वीजेचा एकच दर कसा काय असू शकतो, असा सवाल उपस्थित होत आहे.

नितीश कुमार काय म्हणाले?

नितीश कुमार यांनी पाटण्यात 1462 कोटी रुपयांच्या वीज प्रकल्पाचं उद्गाटन केलं. यावेळी त्यांनी देशभरात एक वीजदर असावा अशी मागणी केली.

यावेळी नितीश कुमार म्हणाले, “देशभरात रेल्वे तिकीटांचे दर समान आहेत, तसेच दर वीजेच्या बाबतीत का नाहीत? एनटीपीसीकडून बिहारला जास्त दराने वीज दिली जाते. बिहारने वीजनिर्मितीपासून वीज वितरणापर्यंत मोठं काम केलं आहे. मात्र तरीही एनटीपीसी आम्हाला जास्त दराने वीज मिळते. एनटीपीसीने देशात समान वीज दर ठेवावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करु”

मुंबईत वितरक अनेक, वीजदरही अनेक

दरम्यान, मुंबईसारख्या शहरात वीज वितरक अनेक आहेत, त्यानुसार वीजेचे दरही वेगवेगळे आहेत. बेस्ट, रिलायन्स, टाटा यासारख्या वीजपुरवठा कंपन्यांचा वीजदर वेगवेगळा आहे. त्यामुळे शहर एकच असून, वीजदर वेगवेगळे का असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ शकतो.