नवी दिल्ली: प्रसिद्ध जैन मुनी तरुण सागर यांची प्रकृती बिघडली आहे. 20 दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाच होत नाही. त्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या तरुण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा घेत आहेत. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं.

तरुण सागर महाराज हे सध्या दिल्लीतील चातुर्मास स्थळी आहेत. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर काल त्यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाली.

तरुण सागर यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांच्या प्रकृतीच्या विचारणेसाठी पाच जैन संतांनी दिल्लीत धाव घेतल्याचं, दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मल सेठी यांनी सांगितलं. यामध्ये सौभाग्य महाराज यांचा समावेश आहे.

दरम्यान, तरुण सागर यांनी आता उपाचर घेण्यास नकार दिला आहे. ते आपल्या अनुयायांसोबत गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील कृष्णा नगर इथल्या राधापुरी जैन मंदिर चातुर्मास स्थळी दाखल झाले. दिल्ली परिसरातील बहुतेक सर्व जैन साधूंनी तरुण सागर यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी चातुर्मास स्थळी धाव घेतली आहे.

कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध

जैन मुनी तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना क्रांतिकारी संत असंही संबोधलं जातं. कडवे प्रवचन नावाची त्यांची पुस्तिकाही प्रसिद्ध आहे.

तरुण सागर यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जा दिला होता.

कोण आहेत तरुण सागर?

मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला.

त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे.

मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

काय आहे संथारा?

जैन धर्माच्या मते, मृत्यू समीप आल्याचं पाहून काही व्यक्ती अन्न-पाण्याचा त्याग करतात. जैन शास्त्राच्या मते याप्रकारच्या मृत्यूला संथारा किंवा संल्लेखना म्हणजेच मृत्यू पर्यंत उपवास करणं म्हणतात. याला जीवनाची अंतिम साधना मानली जाते.

कोर्टाचा विरोध

राजस्थान हायकोर्टाने 2015 मध्ये संथाराला आत्महत्येसारखेच असल्याचं सांगत, दंडनीय केलं होतं. मात्र दिगंबर जैन परिषदेने हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठातील प्राध्यापक वीर सागर जैन यांच्या मते, संथाराची प्रक्रिया 12 वर्षांपर्यंत चालते. ही जैन समाजाची आस्था आहे, त्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग समजलं जातं.

संबंधित बातम्या

पाकमध्ये जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे आपल्या देशात गद्दार: तरुण सागर