नवी दिल्ली : नोटाबंदी हा जुमला नसून महाघोटाळा होता, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. निवडक क्रोनी कॅपिटलिस्टसाठी मोदींनी नोटाबंदीचा घाट घातल्याचा दावा राहुल गांधींनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.


रिझर्व्ह बँकेच्या अहवालामुळे नोटाबंदी फसल्याचं समजलं, असं राहुल गांधी म्हणाले. नोटाबंदी करणे ही चूक असती, तर माफी मागता आली असती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणूनबुजून क्रोनी कॅपटलिस्टचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी नोटाबंदीचा घाट घातला, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

नोटाबंदीमुळे छोटे दुकानदार संपले, मात्र 'अमेझॉन'सारख्या कंपन्या मोठ्या झाल्या. नरेंद्र मोदींनी जनतेचा पैसा उद्योगपतींच्या घशात घातला, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

नोटाबंदीमुळे देशाला मोठी जखम झाली, अर्थव्यवस्था रसातळाला गेली, नोटाबंदीने काहीही साध्य झालं नाही, त्यामुळे मोदींनी देशाला उत्तर द्यावं, असंही राहुल गांधी म्हणाले.

520 कोटींचं राफेल 1670 कोटींवर कसं गेलं? सरकारी कंपन्या सोडून अनिल अंबानींना कंत्राट का? असे सवाल करत अर्थमंत्री अरुण जेटलींमध्ये हिंमत असेल तर राफेल करारप्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, असं आव्हानही राहुल गांधींनी यावेळी दिलं.