Inflation Rate : इंधन दरवाढीसह देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत आहे. सध्या देशात बहुतांश राज्यांमध्ये महागाई दर समाधानकारक श्रेणीच्याबाहेर आहे. महागाईमुळे अनेक राज्यांची अवस्था बिकट आहे. सलग चौथ्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने निर्धारित केलेल्या चलनवाढीच्या (2-6 टक्के) समाधानकारक श्रेणीच्यावर आहे. भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक एप्रिलमध्ये 94 महिन्यांच्या उच्चांकावर होता. 12 मे रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्के होता.  


अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा दर देशाच्या एकूण महागाई दरापेक्षा वेगाने वाढला आहे. दादरा आणि नगर हवेलीमध्ये नऊ महिन्यांची सरासरी 8.3 टक्क्यांहून अधिक आहे. भारतातील अनेक प्रदेशातील हा सर्वोच्च किरकोळ महागाई दर आहे.


बहुतांश राज्यांमध्ये महागाईचा दर सहा टक्क्यांनी जास्त  


सीपीआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढ एकूण 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सहा टक्क्यांवर होती. भारतातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी हे प्रमाण सुमारे 74 टक्के आहे. एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 9.12 टक्के महागाई दर नोंदवला गेला आहे. यानंतर मध्य प्रदेशात 9.10 टक्के आणि तेलंगणात नऊ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त होते. एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे होते की त्यांचा स्वतःच्या चलनवाढीचा दर भारताच्या एकत्रित महागाई दरापेक्षा जास्त होता. केवळ मणिपूर (2.29 टक्के) आणि गोवा (4.01 टक्के) ही दोन क्षेत्रे आहेत जिथे महागाई आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत नोंदवली गेली आहे.


महाग इंधन हे मुख्य कारण  


महागड्या इंधनामुळे ऊर्जेशी संबंधित उत्पादनांच्या तसेच वाहतुकीद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. वाहतुकीचा खर्च जास्त असेल तर अनेक भागात माल पुरवठा करताना आव्हाने निर्माण होतात. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो आणि महागाई दरावर याचा परिणाम होतो. 


महागाई दर आणि आरबीआय


गेल्या तीन तिमाहीत सीपीआय महागाई 5.1 टक्के, 5 टक्के आणि 6.3 टक्के आहे. सलग तीन तिमाहीत तो 6 टक्क्यांच्या वर राहिला तर ते मध्यवर्ती बँकेचे अपयश मानले जाते. महागड्या इंधनामुळे ऊर्जेशी संबंधित उत्पादनांच्या तसेच वाहतूक होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. वाहतुकीचा खर्च जास्त असेल तर अनेक भागात माल पुरवठा करताना आव्हाने निर्माण होतात.