मुंबई : आज म्हणजे 8 ऑक्टोबरला विजयादशमी आणि वायूसेना दिवसाच्या मुहूर्तावर भारताला पहिलं राफेल विमान मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले आहेत. ते फ्रान्सच्या एअरबेसवरुन राफेल विमानातून उड्डाणही करणार आहेत. मात्र भारताला हे राफेल विमान पुढील वर्षी दिलं जाणार आहे.


राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असं म्हणता येईल.

फ्रान्सला पोहोचल्यानंतर राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, "राफेल भारतात येत आहे आणि 8 ऑक्टोबरला ते भारताला सुपूर्द केलं जाईल. यासाठी सगळेच उत्साही आहे, जे स्वाभाविक आहे."

एमबीडीएचे भारतातील प्रमुख लुईक पीडेवाशे यांच्या माहितीनुसार, मिटिऑरला व्हिज्युअल रेंज मिसाईल म्हणून जगातील सर्वात मारक समजलं जातं. तर स्काल्पची मारा करण्याची क्षमताही जबरदस्त आहे. फ्रान्स भारताला 36 राफेल विमान देणार आहे.

राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये

1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.

2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.

4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.

5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.

6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.

7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

भारताला मिळणाऱ्या राफेल विमानात हे सहा बदल होणार!
इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले
रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
लो बॅण्ड जॅमर्स
10 तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
इन्फ्रा-रेड सर्च
ट्रॅकिंग सिस्टम

राफेल मुद्दा, निवडणूक आणि काँग्रेस
2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, राफेल विमानाच्या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रान उठवलं होतं. राफेल सौद्यात रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवला असा आरोप राहुल गांधींनी केला होता. यावेळी त्यांचं "चौकीदार चोर है" हे वाक्याही गाजलं होतं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. परंतु राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीन चिट दिली होती.