श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 10 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी काश्मीरचे नंदनवन पुन्हा खुले होणार आहे.


राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रथमच पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून काश्मीर पर्यटकांसाठी बंद होते.

सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले की, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आदेश दिले आहेत की, पर्यटकांना घाटी सोडून माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला निर्णय तत्काळ मागे घेण्यात येत आहे. राज्यपालांचा आदेश 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे अमरनाथ यात्रेकरुंना तसेच पर्यटकांना काश्मीर सोडावे लागले होते. तेव्हापासून तब्बल दोन महिने काश्मीर पर्यटकांसाठी बंद होते.