India Foreign Policy : कधी राजकीय अस्थिरता, कधी चीनचा हस्तक्षेप तर कधी देशातील अराजकतेमुळे गेल्या काही वर्षांपासून भारताचा शेजारधर्म धगधगता झाला आहे. त्यामुळे शेजारील देशांशी भारताच्या द्विपक्षीय संबंधांवर (India Foreign Policy) कधी नव्हे तो विपरित परिणाम झाला आहे. भारत चीन आणि पाकिस्तानच्या कुरापतींनी त्रस्त असतानाच नेपाळ तटस्थच्या भूमिकेत गेला आहे. टिचभर म्यानमारने (Myanmar) सुद्धा भारताला डोळे वटारण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीने बराच ताण सहन करावा लागला. यानंतर आता भारताचा नेहमीच दोस्त राहिलेला बांगलादेश विरोधात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात बांगलादेशात सरकार कोणाचं स्थापन होणार यावर भारताच्या दोस्तीची (Bangladesh Crisis and Its Implications for India) गणिते अवलंबून असतील.


पाकिस्तान, चीन आणि मालदीव यांची भूमिका भारताविरोधात


भारताच्या 8 शेजारील देशांपैकी पाकिस्तान, चीन आणि मालदीव (Pakistan, China and Maldives) यांची भूमिका भारताविरोधात गेली आहे. कोणासोबत नसल्याने म्यानमार आणि नेपाळची भूमिका (Myanmar and Nepal's position on India) सध्या तटस्थ आहे. सध्या 3 शेजारी भारताचे मित्र असून यामध्ये भूतान, श्रीलंका आणि बांगलादेशचा (Bhutan, Sri Lanka and Bangladesh) समावेश आहे. गेल्यावर्षी नवी दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत भारताने बांगलादेशकडे विशेष लक्ष वेधले होते आणि त्याठिकाणी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. त्यामुळे आता अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. बांगलादेशमध्ये आणखी कोणती परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल हे आगामी काळात लक्षात येणार आहे. 


बांगलादेशमध्ये सध्या काय घडतंय?


1971 मध्ये पाकिस्तानच्या फाळणीनंतर बांगलादेशची निर्मिती झाली. अवघ्या 4 वर्षांनंतर, 1975 मध्ये, बांगलादेशी लष्कराने बंड केले आणि बांगलाबंधू शेख मुजीबूर रहमान यांची हत्या केली. मुजीब शेख हे शेख हसीनांचे वडील होते. बांगलादेशच्या निर्मितीनंतर पुढील 15 वर्षे लष्कराने देशाच्या राजकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केला. सैन्याने 3 वेळा उठाव केला आणि अनेक वेळा तसे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटच्या वेळी 2007-08 मध्ये लष्कर समर्थित सरकार स्थापन झाले आणि ते 2 वर्षे टिकले. शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी देश सोडल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान म्हणाले, 'आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू, आम्ही आता देशाची काळजी घेऊ. आंदोलनात ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय दिला जाईल. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने लष्कर स्वतः सत्ता काबीज करू शकते आणि सर्व अराजकतेचे कारण देत निवडणुका पुढे ढकलू शकते. मात्र, सध्या बांगलादेशातील जनता संतप्त आहे. अशा स्थितीत सेना जास्त काळ सत्तेत राहण्याची शक्यता नाही.


भारतावर कितपत प्रभाव होईल?


बांगलादेशसह आपले शेजारी स्थिर असावेत आणि लोकशाही कायम राहावी अशी भारताची इच्छा असते. अशा स्थितीत भारताला बांगलादेशच्या कोणत्याही स्थितीत निवडणूक आवश्यक असतील. यापूर्वी जेव्हा-जेव्हा लष्कराने उठाव केला आहे, तेव्हा भारतासोबतचे संबंध ताणले गेले आहेत. मात्र, पाकिस्तान आणि चीननंतर पूर्वेकडे दुसरी आघाडी उघडावी, असे भारताला वाटत नाही. भारताला बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार असणं आवश्यक असेल. शेख हसीना चीन आणि भारत यांच्यातील समतोल राखतात. त्यांची भूमिका भारताभिमुख राहिली आहे. बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना प्रथम भारतात आल्या आहेत.


बांगलादेशात 90 दिवसात निवडणूक अपेक्षित 


बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार यांनी देशाला संबोधित करताना म्हटले आहे की, देशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. त्यासाठी त्यांनी विविध पक्षांशी बोलणीही केली आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हे काळजीवाहू सरकार 90 दिवसांत निवडणुका घेऊ शकते. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद सहाबुद्दीन यांनी बांगलादेशच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे निवडणुका झाल्या तर खलिदा झिया यांचा पक्ष बीएनपी त्यात सहभागी होईल. शेख हसीनाविरोधातील जनक्षोभाचा फायदा बीएनपीला निवडणुकीत होऊ शकतो. अशा परिस्थितीत बदल म्हणून जनता बीएनपीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत खालिदा झिया किंवा त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतात.


बीएनपी सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? 


बीएनपी पुन्हा सत्तेत आल्यास भारतासाठी संकट येईल. खालिदा झिया त्यांच्या भारतविरोधी धोरणासाठी ओळखल्या जातात. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या पक्षाने 'इंडिया आउट' मोहीम सुरू केली होती. बीएनपीने भारतात तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. बीएनपीचे सरकार आल्यावर भारताची निर्यात थांबेल. बांगलादेशात सुरू असलेल्या अनेक भारतीय प्रकल्पांना याचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशही नेपाळप्रमाणे चीनकडे मैत्रीचा हात पुढे करू शकतो.


कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी सत्तेवर आली


बांगलादेशच्या विद्यार्थी चळवळीच्या पायाभरणीत जमात-ए-इस्लामीचा हात असल्याचे म्हटले जाते. अशा स्थितीत जमातच्या डोक्यावर विजयाचा मुकुट बसू शकतो. बांगलादेशातील दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानशी जमातचे संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्यावर बंदी घालण्यात आली. जमातने उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. नव्या परिस्थितीत जमातवरील बंदी उठवून ती निवडणुकीत सहभागी झाली, तर बांगलादेशात मोठा बदल होईल. ज्यांना बदल हवा आहे तेच कट्टरवाद्यांना विजय मिळवून देतील अशी शक्यता आहे.


तर बांगलादेश भारताचा शत्रू देश होईल 


जमातला सत्ता मिळाल्यास बांगलादेश भारताचा शत्रू देश होईल. वास्तविक, जमात ही पाकिस्तानच्या जमात-ए-इस्लामी पक्षाची शाखा आहे. असे झाले तर बांगलादेशात कट्टरतावादी पंथ वाढतील. पाकिस्तानप्रमाणे भारतालाही बांगलादेशातून होणाऱ्या दहशतवादाच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या