नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचेही 43 जवान ठार किंवा जखमी झाले आहेत. या झटापटीत शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांप्रती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "ज्या अधिकारी आणि जवानांनी देशासाठी आपले प्राण दिले त्याबद्दल जाणवत असलेली वेदना कोणतेही शब्द व्यक्त करु शकत नाहीत. त्यांच्या प्रियजनांचं मी सांत्वन करतो. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत आहोत."





भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.


भारत-चीन तणावावरुन राहुल गांधींचे यापूर्वीचे ट्वीट
दरम्यान राहुल गांधी यांनी यापूर्वीही भारत-चीन सीमेवरील तणावावरुन ट्वीट केले आहेत. एक बातमी शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, "चीनने घुसखोरी करुन लडाखमधील आपल्या क्षेत्रावर ताबा मिळवला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन धारण करुन बसले आहेत."





त्याआधी राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना थेट प्रश्न विचारला होता. संरक्षण मंत्र्यांचं हाताच्या चिन्हावर भाष्य करुन झालं असेल तर ते चीनने लडाखमधील भारतीय क्षेत्र व्यापलं आहे का? याचं उत्तर देणार का असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता.





त्याआधी राहुल गांधी यांनी सीमेच्या मुद्द्यावर शायरीचा आधार घेतल सरकारवर टीका केली होती. "सब को मालूम है 'सीमा' की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को, 'शाह-यद' ये ख़्याल अच्छा है।", असं ट्वीट त्यांनी केलं होतं.





भारत-चीन वाद नेमका काय आहे?
लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.


संबंधित बातम्या




India-China Border Tension गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण, भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती