एक्स्प्लोर
हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वजीर

दिसपूर : पूर्वेकडील राज्य आसामध्ये भाजपने इतिहास रचला आहे. कारण आसामच्या इतिहासात पहिल्यांदाज भाजपने बहुमत मिळवलं आहे. 126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजपने 90 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. या विजयाचा खरा हिरो म्हणजे हिमांता बिस्वा सरमा होय.
- आसाममध्ये भाजप सत्तेत येणार हे वर्षभरापूर्वी सांगितलं असतं तर कुणीही विश्वास ठेवला नसता पण...2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तांतराची बीजं रोवली गेली. तोपर्यंत हिमांता काँग्रेसचे कट्टर विश्वासू नेता, निवडणुका जिंकून देणारे मुख्य स्ट्रॅटेजिस्ट होते.
- हिमांता बिस्वा सरमा हे 3 टर्म काँग्रेस आमदार, अनेक मंत्रीपदं भूषवलेली, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे अत्यंत निकटवर्तीय, अत्यंत महत्वाकांक्षी अशी त्यांची ओळख होती.
- तरुण गोगोईंच्या सावलीत वाढ होणार नाही हे लक्षात आल्यावर हिमांता सरमा अस्वस्थ होते.
- त्यांची नाराजी पक्षाचं किती नुकसान करु शकेल याचा अंदाज घेण्यात काँग्रेस हायकमांड अपयशी ठरली, सरमांकडे दुर्लक्ष करणं हीच काँग्रेसची मोठी चूक ठरली.
- लोकसभा निवडणुकीदरम्यान निर्णय प्रक्रियेत डावललं गेल्यानं नाराज हिमांतांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.
- वर्षभरात म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा प्रचार मोहिमेचं सुकाणू भाजपनं त्यांच्या हाती दिलं.
- 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला हरवायचं असेल तर नवी समीकरणं बनवावी लागतील हे त्यांना माहिती होतं.
- हिमांतांनीच काँग्रेसचा बराच काळचा सत्तेतील भागीदार पक्ष बोडो पीपल्स फ्रंटला (Bodo People's Front) काँग्रेससोबतचं नातं तोडायला लावलं
- एनडीएचा जुना घटक पक्ष असलेल्या आसाम गण परिषदसोबतचं नातं घट्ट करण्यातंही मोलाची भूमिका बजावली.
- बांग्लादेशी घुसखोरांची समस्या, मुस्लिमांचं लांगुलचालन, एआयूडीएफचे बद्रुद्दिन अजमल, काँग्रेसमधील घराणेशाही अशा मुद्द्यांवर प्रचारसभा घेत त्यांनी आसाम पिंजून काढला.
- ईशान्येकडील अनेक राज्यात हिमांता प्रचंड लोकप्रिय आहेत, मणिपूर पोटनिवडणुकीत भाजपला दोन जागा मिळाल्या त्याचं श्रेय बरेच जण हिमांतांनाच देतात.
- पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळा तसंच गोव्यातील लुई बर्जर लाच प्रकरणातही हिमांता सरमांचं नाव आलं. मात्र ईशान्य भारतात पहिल्यांदाच भाजपला सत्ता मिळवून दिल्यानं त्याचा विसर भाजपला पडला तर नवल वाटायला नको.
- केंद्रात मंत्री असलेले सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे मुख्यमंत्री बनणं नक्की आहे, मात्र अतिमहत्वाकांक्षी हिमांता यांना ते कसं हाताळतात यावर भाजपचं सत्तासुख अवलंबून आहे.
- कुणी त्यांना किंगमेकर म्हणतं तर कुणी एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या विराट कोहलीशी तुलना करतं.
- सत्तापाटाच्या या खेळात अनेक फासे भाजपच्या बाजूने पडले. हिमांता बिस्वा सरमा त्यापैकीच एक
- थोडक्यात आसाममध्ये काँग्रेसने गमावलं ते भाजपनं कमावलं...
आणखी वाचा





















