कोविड 19 लसीसाठी बूस्टर डोसचा विचार अद्याप केंद्र सरकारने केला नसल्याची माहिती शनिवारी, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी दिली आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा हवाला देऊन सांगितले की, या संदर्भात अशी कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.


कोविड लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही
व्ही के पॉल यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला सांगितले, की "बूस्टर डोसची वेळ आणि आवश्यकता यामागील विज्ञान अजूनही विकसित होत आहे. कंपन्यांनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून संशोधन केलं जात आहे." ते पुढे म्हणाले की भारतातील प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन डोस देऊन लसीकरण करणे ही आतापर्यंतची मोठी चिंता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना पॉल म्हणाले की, जगातील काही देशांनी बूस्टर डोस देऊन लसीकरण सुरू केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत त्यांनी असेही म्हटले आहे की या विषयावर अद्याप कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.


बुस्टर डोसवर सरकार विचार करत नाही
सायरस पूनावाला यांनी दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी कोविशील्डच्या तिसऱ्या किंवा बूस्टर डोसच्या गरजेवर भर दिला होता. पॉल म्हणाले, "आम्ही या क्षेत्रात नव्याने तयार होणाऱ्या डेटाकडे लक्ष ठेऊन आहोत आणि यासंदर्भात लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाकडून मार्गदर्शन घेत आहोत." त्यांनी सांगितले की कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी सल्लागार गटाकडून कोणताही सल्ला मिळाला नाही. त्यांनी दावा केला की कोविशील्डच्या दोन डोसमधील सध्याच्या अंतराची वेळ विज्ञानावर आधारित आहे आणि त्याबद्दल कोणतीही समस्या नाही. म्हणून, सरकार दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार करत नाही.


गेल्या 24 तासात देशात 31 हजार रुग्णांची भर तर 403 जणांचा मृत्यू
देशातील कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप कमी येण्याची चिन्ह दिसत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात कोरोनाच्या 30 हजार 948 रुग्णांची भर पडली तर 403 जणांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवशी 38 हजार 487 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी देशात 34 हजार 457 रुग्णांची नोंद झाली होती तर 375 रुग्णांचा मृत्यू झाला होता.