बंगळुरु: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबतची माहिती दिली.


तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही कर्नाटक सरकारकडून गौरी लंकेश हत्येचा अहवाल मागवण्याचे आदेश गृहसचिवांना दिला आहे.

कलबुर्गी,पानसरे आणि दाभोलकर हत्येत समान हत्यारं वापरण्यात आली, मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येत तीच पद्धत वापरण्यात आली का, हे अद्याप समजू शकलेलं नाही, असं  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

गौरी लंकेश काही दिवसांपूर्वीच मला भेटल्या होत्या, मात्र धमक्या आल्याबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं, असं सिद्धरामयांनी सांगितलं.

यापुढे प्रगतशील विचार मांडणाऱ्या लेखकांना संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहितीही सिद्धरामय्यांनी दिली.

बंगळुरुत पोलीस बंदोबस्त

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर बंगळुरुमध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसंच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गींच्या हत्येनंतर देशात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात झाली. बंगळूरमधल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.



बंगळुरूतल्या राजराजेश्वरी नगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.

55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तीन आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.

मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.

भाजप नेत्यांविरोधात लेख

बंगळूरमध्ये गोरी लंकेश या  ‘लंकेश पत्रिका’ हे कन्नड साप्ताहिक चालवत होत्या. धारवाडचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दुशी या दोघांविरोधात गौरी लंकेश यांनी त्यांच्या साप्ताहिकात लेख लिहिला होता. त्या लेखाविरोधात दोन्ही भाजप नेत्यांनी, त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता.

2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने, त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती.

सीबीआय चौकशीची मागणी

दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी कऱण्याची मागणी गौरी लंकेश यांचे भाऊ इंद्रजीत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या