लखनौ : मोठा गाजा वाजा करत काल उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र आज पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. आलमबाग स्टेशनवर ही मेट्रो बंद पडली.

विशेष म्हणजे मेट्रोचे अधिकारीही या मेट्रोने प्रवास करत होते. मेट्रो बंद पडल्यानंतरही बराच वेळ मेट्रो इंजिनिअर्सला बिघाड दुरुस्त करता आला नाही. त्यानंतर आत्पकालीन दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.



केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक यांनी या मेट्रोचं उद्घाटन केलं होतं. बुधवारी सकाळी 6 वाजता लखनौ मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

दरम्यान उत्तर प्रदेशात मेट्रो कुणी आणली यावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरु आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ही मेट्रो आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं नेहमी सांगत. मात्र या मेट्रोचं उद्घाटन त्यांच्या कार्यकाळात होऊ शकलं नाही.