रांची : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि इतर दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. रांचीमधील सीबीआय कोर्ट आज सकाळी 11 वाजता सर्व दोषींना शिक्षा सुनावेल.


कोर्टाचे वकील विंदेश्वरी प्रसाद यांचं काल (3 जानेवारी) निधन झाल्याने रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षेची सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलली होती.

वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे?

सीबीआयच्या विशेष कोर्टाने 23 डिसेंबर 2017 रोजी लालूप्रसाद यादव, माजी खासदार आर के राणा आणि जगदीश शर्मा यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवलं आहे. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, माजी मंत्री विद्यासागर निषाद, बिहार विधानसभेच्या लोकलेखा समिती (पीएसी)चे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला.

तर दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विधानं केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचं न्यायालयाने सांगितलं.

चारा घोटाळा नेमका काय आहे?
चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. बिहारच्या पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता.

1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता.

या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर होते.

आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. यात लालूंनी 89 लाख 27 हजार रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे.

चारा घोटाळा : लालूंसह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष


सर्व खटले एकत्रित चालवण्यास कोर्टाचा नकार
चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले होते.

चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री
चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल.

सरयू राय हे सध्या झारखंडमधील भाजप सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री आहेत. 2014 साली ते पश्चिम जमशेदपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चारा घोटाळा बाहेर काढल्याने ते प्रकाशझोतात आले होते.

संबंधित बातम्या :

चारा घोटाळा : मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा : लालू

चारा घोटाळ्याचा फैसला, लालूंना शिक्षा की सुटका?