चारा घोटाळा : लालूंसह 16 दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2018 08:44 AM (IST)
तर दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
रांची : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि इतर दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. रांचीमधील सीबीआय कोर्ट आज सकाळी 11 वाजता सर्व दोषींना शिक्षा सुनावेल. कोर्टाचे वकील विंदेश्वरी प्रसाद यांचं काल (3 जानेवारी) निधन झाल्याने रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षेची सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलली होती. वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे? सीबीआयच्या विशेष कोर्टाने 23 डिसेंबर 2017 रोजी लालूप्रसाद यादव, माजी खासदार आर के राणा आणि जगदीश शर्मा यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवलं आहे. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, माजी मंत्री विद्यासागर निषाद, बिहार विधानसभेच्या लोकलेखा समिती (पीएसी)चे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. तर दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विधानं केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचं न्यायालयाने सांगितलं. चारा घोटाळा नेमका काय आहे? चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. बिहारच्या पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर होते. आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. यात लालूंनी 89 लाख 27 हजार रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे.