नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता ओळखायला मूडीजला थोडा उशीरच झाला असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी व्यक्त केलं. तसंच जीएसटी आणि नोटबंदीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आता आत्मपरिक्षण करावं, असा टोलाही जेटलींनी लगावला.


मूडीजबद्दल बोलताना अरुण जेटली म्हणाले की, "आम्ही 13 वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील मूडीजच्या अपग्रेडचं स्वागत करतो. असे अपग्रेड अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदलांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांसाठी दिले जातात. गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेला मजबूत, स्थिर आणि दृढ करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांसाठीच हे रेटिंग असल्याचं आम्ही मानतो."

अर्थमंत्री पुढे  म्हणाले की, "अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले, त्यात डिजिटायझेशन, आधार, जीएसटी, बँक रीकॅपिटलायझेशन आदींचा समावेश होता. या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. या रँकिंगमुळे सरकारच्या निर्णयांना आंतराष्ट्रीय मान्यता मिळाली," असंही त्यांनी सांगितलं.

नोटाबंदी आणि जीएसटीवर टीका करणाऱ्यांना उद्देशून अरुण जेटली म्हणाले की, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेवर काही लोकांना संशय वाटतो. पण त्यांनी आता तरी यावरुन आत्मपरिक्षण करावं. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाल्याने, आमच्या उद्देशांना नवं बळ मिळालं आहे."

13 वर्षांनंतर रेटिंगमध्ये सुधारणा
आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं.

BAA3 चा अर्थ काय?
BAA3 रेटिंगचा अर्थ म्हणजे सर्वात कमी गुंतवणुकीची स्थिती असणं. म्हणजेच आता मूडीजनुसार भारतात गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं आहे. यामुळे रेटिंग BAA3 ने वाढवून  BAA2 केलं आहे.

‘मूडीज’च्या रँकिंगनंतर शेअर बाजारात मोठी उसळी

मूडीजने काय म्हटलं?
एखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे.

विकासदर वाढणार
मोदी सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम काही काळाने दिसेल. उदाहरणार्थ, जीएसटी आणि नोटबंदीमुळे काही काळ विकासदरात घसरण झाली होती, असं मूडीजने म्हटलं आहे. पण मार्च 2018 पर्यंत भारताचा विकासदर 6.7 टक्के होईल. तर 2019 पर्यंत विकासदर पुन्हा एकदा 7.5 टक्क्यांवर पोहोचेल, असं अंदाज मूडीजने वर्तवला आहे.

मूडीजचं नेमकं काम काय ?
मूडीज इन्वेस्टर सर्विसेस ही संस्था मूडीज् म्हणूनच ओळखळी जाते. ही संस्था जगातील विविध अर्थव्यवस्थांवर आणि त्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यानुसार प्रत्येक अर्थव्यवस्थेचं मानांकन करते. मूडीजने दिलेलं मानांकन अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह मानलं जातं.

संबंधित बातम्या

मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ