Farmers Protest : आज शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.


शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना खुलं पत्र


अखिल भारतीय किसान संघर्, समन्वय समितीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मोदी आणि तोमर यांना हिंदीतून लिहिण्यात आलेल्या वेगवेगळ्या पत्रांमध्ये समितीने म्हटलं आहे की, सरकारचा हा गैरसमज आहे की, तिनही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून सुरु ठेवण्यात येत आहे.


शेतकऱ्यांनी का लिहिलं मोदींना पत्र?


पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बोलताना शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, विरोधक नव्या कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मोदींना खुलं पत्र लिहिणारी समिती ही त्या 40 शेतकरी संघटनांपैकी एक आहे, जी गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "सत्य हेच आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने राजकीय पक्षांना आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. अशातच तुम्ही जे आरोप करत आहात, ते अत्यंत
चुकीचे आहेत." तसेच पुढे बोलताना समितीने पत्रात म्हटलं आहे की, "विरोध करणारी कोणतीही शेतकरी संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही."


'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे' म्हणत ट्रॉली टाइम्स बनणार शेतकरी आंदोलनाचा आवाज


सिंघु बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक्टरच्या हजारो ट्रॉल्यांची रांग दिसते. टिकरी बॉर्डरवरही हीच परिस्थिती आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांची मतं आता या हजारो ट्रॉल्यांपर्यंत पोहचण्यासाठी 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याचा पहिला अंक प्रकाशीत झाला.


प्रत्येक ट्रॉलीपर्यंत आंदोलनाचा उद्देश पोहचला पाहिजे तसेच अशा प्रकारचं वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पनाही एका ट्रॉलीमध्येच सूचल्यानं या वृत्तपत्राचं नाव 'ट्रॉली टाइम्स' असं ठेवण्यात आलंय. सध्या हे वृत्तपत्र आठवड्यातून दोनदा प्रकाशीत करण्यात येणार आहे.


'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे'


या वृत्तपत्रकांच्या लीड स्टोरीचे शिर्षक आहे 'जुडेंगे, लडेंगे, जीतेंगे'. चार पानांचे हे वृत्तपत्र हिंदी आणि पंजाबी भाषेतून प्रकाशीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तपत्रात कविता आणि कार्टून्सना देखील स्थान देण्यात आलंय. 'ट्रॉली टाइम्स' या वृत्तपत्राची सुरुवात करण्याची कल्पना सुरमीत मावी यांची आहे. सुरमीत मावी हे व्यवसायाने कथाकार आहेत आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्टही लिहतात. त्यांनी सांगितलं की, "वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज देशातील लोकशाही धोक्यात येत असताना हे वृत्तपत्र क्रांती करेल. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याशी जोडणार आहोत, आणि एकत्रित लढणार आहोत."