Uttarakhand उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्यामुळं एकच हाहाकार माजला. जोशीमठ भागात आलेल्या या आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, तब्बल 150 जण बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येत आहे. या भागात आलेल्या या आपत्तीनंतर प्रशासनाकडून थेट हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे उत्तराखंडमध्ये अशा प्रकाच्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवण्याची ही पहिल्ची वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा इथं अनेकदाच निसर्गाचा कोप पाहायला मिळाला होता.




1991 उत्तरकाशी भूकंप: अविभाजित उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबर 1991 मध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये 768 लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारोंच्या संख्येनं कुटुंबं बेघर झाली होती.

1998 माल्पा दरड: पिथौरगड जिल्ह्यातील माल्पा या गावात दरड कोसळल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 55 यात्रेकरुंसमवेत जवळपास 255 जणांचा मृत्यू झाला. शारदा नदीवर याचे परिणाम दिसून आले होते.

1999 चमोली भूकंप: चमोलीमध्ये 6.8 इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंही हाहाकार माजवला होता. यामध्ये 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. शिवाय याचे परिणाम शेजारी असणाऱ्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातही दिसून आले होते. या अतिशय ताकदीच्या भूकंपामुळं रस्ते आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या.

Uttarakhand Glacier Collapse Video | 'भागोsss', हिमकडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं

2013 उत्तराखंड महाप्रलय: जून महिन्यात एकाच दिवशी ढगफुटीच्या अनेक घटना घडल्यामुळं उत्तराखंड आणि बहुतांश उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये मृतांचा आकडा धडकी भरवणारा होता. या आपत्तीमध्ये तब्बल 5700 हूनही अधिकजणांचा मृत्यू धाला होता. याशिवाय रस्ते, महामार्ग, पूल, घरं, गावं सारंकाही नष्ट झालं होतं. जवळपास 3 लाख लोक यादरम्यानच्या काळात प्रभाविक भागांमध्ये अडकले होते.