मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या पॅकेजवरुन आता कॉंग्रेसमध्ये वेगवेगळी मतं समोर येत आहेत. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी या पॅकेजचं कौतुक करत स्वागत केलं आहे तर काहींनी मात्र या पॅकेजला आपला विरोध दर्शवला आहे.


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या पॅकेजचं कौतुक केलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या पॅकेजवर समाधानी असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी मात्र याचा विरोध केला आहे.

समाधानाची बाब, योग्य विनियोगाची अपेक्षा : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान 10 टक्के (21 लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा आहे, असं चव्हाण यांनी म्हटलंय.

'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा, कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज

उशीरा का होईना पण योग्य पाऊल : अशोक गहलोत 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या विशेष आर्थिक पॅकेजचं स्वागत केलं आहे. उशीरा का होईना पण योग्य पाऊल उचललं आहे, असं त्यांनी म्हटलंय. आपल्या ट्विटमध्ये गेहलोत यांनी म्हटलं आहे की 'पीएम मोदी यांनी घोषित केलेलं हे आर्थिक पॅकेज बहुप्रतिक्षित होतं. उशीरा का होईना पण योग्य पाऊल उचललं आहे. आम्ही याचं स्वागत करतो. मात्र पॅकेजचं विवरण आल्यावरच आपल्याला माहीत होईल की कुठल्या क्षेत्राला किती फायदा होणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Coronavirus : अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा

 आर्थिक पॅकेजची वेळेवर घोषणा : मिलिंद देवरा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'पीएम मोदी यांनी 266 बिलियन अमेरिकी डॉलरच्या आर्थिक पॅकेजची वेळेवर घोषणा केली आहे. जर हे चांगल्या पद्धतीनं लागू केलं तर आपण एका मानवीय संकटावर मात करु शकू. जागतिक स्तरावर भारताची  भूमिका आणि मेक इन इंडियाच्या क्षमतांचा विस्तार करु शकू'

नाकामी पाहून निराशा : रणदीप सुरजेवाला

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आपल्या घरी चाललेल्या प्रवाशी मजुरांना होणाऱ्या त्रासाकडे करुणेच्या नजरेने पाहणे गरजेचे आहे. तसंच त्यांना सुरक्षित घरी पोहोचवणे गरजेचे आहे.  लाखों प्रवाशी मजूर आपल्यातील संवेदनशीलतेची कमी आणि आपली नाकामी पाहून निराश झाले आहेत.

ही फक्त हेडलाईन हंटिंग : मनीष तिवारी 
कॉंग्रेस नेते आणि  माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे की, पीएम मोदी यांनी केवळ हेडलाईन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त आकडे दिले आहेत. त्याचं विवरण दिलेलं नाही. तिवारी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'पीएम मोदींच्या भाषणाला एका ओळीत सांगायचं झालं तर ही फक्त हेडलाईन हंटिंग आहे. एक आकडा आहे, वीस लाख कोटी, कुठलंही विवरण नाही'.

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर अभियान भारत पॅकेजमुळे देशाला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

केंद्र सरकारची 1.70 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा, कुणाला कशी मिळणार मदत?

नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश असणार आहे. या विशेष पॅकेजच्या माध्यमातून देशातील विविध घटकांना, आर्थिक व्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचा पाठिंबा मिळेल. 20 लाख कोटी रुपयांच्या या पॅकेजमुळे 2020 मध्ये देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विकासाच्या प्रवासाला नवीन वेग मिळेल, असं मोदींनी म्हटलं होतं.

आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये सर्व स्तरावर जोर देण्यात आला आहे. या आर्थिक पॅकेजच्या मदतीने लघू उद्योग, मध्यम उद्योग, गृह उद्योगांना फायदा होईल. देशातील श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे, जे प्रत्येक परिस्थितीत देशवासियांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. देशातील मध्यमवर्गासाठी हे पॅकेज आहे, जे प्रामाणिकपणे कर भरतात आणि देशाच्या विकासात योगदान देतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.

कोरोना व्हायरस भारतासाठी एक संधी घेऊन आला आहे. जेव्हा कोरोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट तयार केलं जात नव्हतं आणि एन-95 मास्कचंही नावापुरतं उत्पादन होत होतं. पण आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. अशारीतीने आपण कोरोना संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात स्वावलंबी शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं होतं.

लॉकडाऊन वाढणार, 18 मे पूर्वी होणार घोषणा 

लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. येत्या 18 पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं.