नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियान' या 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर अभियान भारत पॅकेजमुळे देशाला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आजच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश असणार आहे. या विशेष पॅकेजच्या माध्यमातून देशातील विविध घटकांना, आर्थिक व्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचा पाठिंबा मिळेल. 20 लाख कोटी रुपयांच्या या पॅकेजमुळे 2020 मध्ये देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विकासाच्या प्रवासाला नवीन वेग मिळेल, असं मोदींनी म्हटलं.


आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये सर्व स्तरावर जोर देण्यात आला आहे. या आर्थिक पॅकेजच्या मदतीने लघू उद्योग, मध्यम उद्योग, गृह उद्योगांना फायदा होईल. देशातील श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे, जे प्रत्येक परिस्थितीत देशवासियांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. देशातील मध्यमवर्गासाठी हे पॅकेज आहे, जे प्रामाणिकपणे कर भरतात आणि देशाच्या विकासात योगदान देतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.


केंद्र सरकारची 1.70 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा, कुणाला कशी मिळणार मदत?


कोरोना व्हायरस भारतासाठी एक संधी घेऊन आला आहे. जेव्हा कोरोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट तयार केलं जात नव्हतं आणि एन-95 मास्कचंही नावापुरतं उत्पादन होत होतं. पण आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. अशारीतीने आपण कोरोना संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात स्वावलंबी शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.


Coronavirus : अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा


लॉकडाऊन वाढणार, 18 मे पूर्वी होणार घोषणा 


लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. येत्या 18 पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.


Lockdown 4 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा,कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज