नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड -19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापन याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता लक्षात घेऊन लस उपलब्धता जलद गतीने सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. लस वाहतूक , वितरण आणि व्यवस्थापनातील प्रत्येक पाऊल कठोरपणे उचलण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामध्ये शीतगृह साखळी, वितरण नेटवर्क, देखरेख यंत्रणा, आगाऊ मूल्यांकन आणि वेल्स, सिरिंज इत्यादी आवश्यक उपकरणे तयार करणे यांचा समावेश असावा.


आपण निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा देशात वापर करायला हवा, असेही त्यांनी निर्देश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, त्याच पद्धतीने लस वितरण आणि प्रशासकीय यंत्रणाचे नियोजन केले जावे. यात राज्ये, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा पातळीवरील अधिकारी, नागरी संस्था, स्वयंसेवक, नागरिक आणि सर्व आवश्यक क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असावा. संपूर्ण प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मजबूत कणा असावा आणि व्यवस्थेची रचना अशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपली आरोग्य सेवा प्रणाली शाश्वत राहील.


कोविड रुग्णांच्या दररोजच्या संख्येत आणि वाढीच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. रुग्णसंख्येत घट झाल्याबद्दल आत्मसंतुष्ट न राहता सावधगिरी बाळगून महामारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने सुरक्षित सामाजिक अंतर, मास्कचा वापर , नियमितपणे हात धुणे आणि स्वच्छता राखणे यासारखे कोविड प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्यावर त्यांनी भर दिला.


भारतात तीन लसी विकासाच्या प्रगत टप्प्यात आहेत, त्यापैकी 2 दुसऱ्या टप्प्यात आणि एक तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथके अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांबरोबर सहकार्य करत असून संशोधन क्षमता मजबूत करत आहेत. बांगलादेश, म्यानमार, कतार आणि भूतानकडून त्यांच्या देशांमध्ये क्लिनिकल चाचण्यांसाठी विनंती केली जात आहे. जागतिक समुदायाला मदत करण्याच्या प्रयत्नासाठी पंतप्रधानांनी सूचना केली की आपण लस वितरण प्रणालीसाठी लसी, औषधे आणि आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न शेजारी देशांपुरते मर्यादित ठेवू नये तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत.