नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्य तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चीनच्या चांगलंच सुनावलं आहे. भारताने भूतान सीमेवरुन आपले सैन्य मागे घ्यावे, अशी चीनने मागणी केली आहे. त्यातच चीनच्या वृत्तपत्रातून भारतानं 1962 चं युद्ध विसरु नये, अशी धमकी दिली होती. त्यावर शुक्रवारी प्रतिक्रिया देताना, संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी चीनला चांगलंच खडसावलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरुण जेटलींनी 1962 मधील तो भारत आता राहिला नाही. 2017 मधील भारत आणि 1962 मधील भारत यामध्ये खूप फरक आहे, असं सांगितलं आहे.


भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर कैलास मानसरोवरची यात्रा करणाऱ्या भारतीय तीर्थयात्रींसाठी मार्ग चीननं बंद केला होता. यावरुन अरुण जेटलींनी चीनला भूतान-चीन कराराची आठवण करुन दिली. जेटली म्हणाले की, ''वास्तविक, ही जमीन भूतानची असून, भारताच्या सीमेला लागून आहे. तसेच या दोन्ही देशांच्या सुरक्षेशी संबंधित हा विषय असल्यानं, यावर भूतानं आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. चीनकडून यासाठी भूतानसोबत करार केला असून, त्यात या भागाच्या शांततेसाठी चीन सदैव सहकार्य करेल, असं मान्य केलं आहे."

जेटली पुढे म्हणाले की, ''पण सीमा भागातील सद्य स्थिती पाहता हा भाग बळकावण्याचा चीनचा हेतू आहे. तेव्हा याबाबत मुद्दे स्पष्ट असताना, जर कुणाला वाटत असेल की, आम्ही तिथं जाऊ, आणि जमीनीवर कब्जा करु, तर ते योग्य नाही. 1962 मधील स्थिती अतिशय वेगळी होती. पण आत्ताचा भारत वेगळा आहे.''

दरम्यान, चीनच्या सैन्यदलाकडून जोमप्लरी परिसरातील डोकमलमध्ये रस्ते निर्माणाच्या कामावर भूतानने गुरुवारी आक्षेप घेतला आहे. चीनने हे रस्ते बांधणीचे काम तत्काळ थांबवावे, आणि त्यांनी (चीनने) जमीनीचा कब्जा सोडावा, अशी मागणी भूताननं केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीने चीनचा चांगलाच जळफळाट झाला होता. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ नावाच्या वृत्तपत्राने मोदी-ट्रम्प भेटीवरुन चांगलीच आगपाखड केली होती.

भारताने अमेरिकेशी कितीही जवळीक साधली तरी भारताचा काहीही फायदा होणार नाही. पण ही जवळीक वाढल्यास, भारताला ते महाग पडेल, असा इशारा चिनी मीडियाने दिला आहे. तसेच 1960 साली अमेरिकेने कशाप्रकारे भारताचा वापर केला हे भारताने विसरु नये, असे सांगत, या लेखातून 1962 च्या भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाबद्दलही यातून आठवण करुण देण्यात आली होती

संबंधित बातम्या

...तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी