नवी दिल्ली :  देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. भारतातील कोरोना बळींची संख्या 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. काल एकूण 2003 मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्राने काल यापूर्वीच्या 1328 मृत्यूंची तर दिल्लीने 344 मृत्यूंची नोंद केल्याने देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात 10 हजार 974 ने वाढ झाली तर 331 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशभरात आजपर्यंत कोरोनामुळं 11903 लोकांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 54 हजार 065 वर गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 55 हजार 227 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 6 हजार 922 रुग्ण बरे झाले तर 331 मृत्यूमुखी पडले आहेत. देशात 3 तारखेला अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाख 46 हजार 450 ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या 4 हजार 416 ने वाढली आहे.

महाराष्ट्रात काल 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. काल कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 445 इतका झाला आहे. पैकी सध्या 50 हजार 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 48019 रुग्ण, 26782 बरे झाले, मृतांचा आकडा 528


दिल्ली  44688 रुग्ण, 16500 बरे झाले, मृतांचा आकडा 1837


गुजरात  24577 रुग्ण, 17082 बरे झाले,  मृतांचा आकडा 1533


राजस्थान  13216 रुग्ण, 9849 बरे झाले, मृतांचा आकडा 308


मध्यप्रदेश 11083 रुग्ण, 8152 बरे झाले, मृतांचा आकडा 476

उत्तरप्रदेश 14091 रुग्ण, 8610 बरे झाले, मृतांचा आकडा 417


पश्चिम बंगाल 11909 रुग्ण, 6028 बरे झाले , मृतांचा आकडा 495