Electricity Bill: मुंबई : उन्हाळ्यात (Summer) आणि पावसाळ्यात (Monsoon) वीजपुरवठा अनेकदा खंडीत (Power Outage) झाल्यानं वीज विभाग अनेकांच्या टार्गेटवर असतो. अनेकदा अव्वाच्या सव्वा लाईट बील (Light Bill) आल्याच्या तक्रारी आपण ऐकत असतो. वीजेचा वापर अत्यंत कमी, पण लाईट बील काहीच्या काही आल्याच्या तक्रारी नेहमीच कानावर पडतात. असाच काहीचा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जे घडलं ते वीज विभागाला नक्कीच लाजवेल, असं बोललं जात आहे. कानपूरमधील एका कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला तब्बल 24 लाखांचं लाईट बील आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


प्रत्यक्षात एका कच्च्या घरात राहणाऱ्या तरुणाचं वीज बिल इतकं जास्त असल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पीडित तरुणाला अनेकांनी वीज विभागात जाऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. कानपुरात राहणाऱ्या तरुणानं वीज विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली. कानपुरात राहणारा पीडित चंद्रशेखर 4 ते 5 महिन्यांपासून वीज बिल थकीत असल्याचं सांगत होता. त्यानंतर विभागप्रमुखांनी त्याचं वीजबिल काढलं. त्यावेळी केवळ तोच नाहीतर विभागप्रमुखांच्याही पायाखालची जमिन सरकली. वीज बिल 23 लाख 94 हजार 512 रुपयांचं होतं. 


पीडित तरुणानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तो कानपूरमधील छोट्याशा गावात एका पडक्या घरात राहतो. त्याच्या घरात फक्त एक कुलर, एक फ्रीज आणि 2 पंखे आहेत. एवढंच नाहीतर तो झोपडपट्टीत राहत असून त्याच्या घरावरचं शेडही पत्राचं आहे. त्यानंतर त्यानं 24 लाखांचं लाईट बिल पाहून मोठा धक्का बसल्याचंही सांगितलं. 


याप्रकरणी केस्कोचे मीडिया प्रभाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब अत्यंत गंभीर असून याची अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली आहे. हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचंही त्यांनी सांगितलं. केईस्कोच्या सर्व्हरमध्ये केलेल्या बदलांमुळे काही वीजेच्या मीटरमध्येही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे योग्या जेटा घेता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच ग्राहकांची अडचण दूर केली जाईल आणि एवढं मोठं बिल भरावं लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 


दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील असली तरी महाराष्ट्रातही असे अनेक प्रकार घडल्याचं आपण पाहिलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटानं मुंबईतल्या विविध भागात आंदोलन केलं आहे. जुन्या चाळी, झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत द्या, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.