Indias climate warriors : सध्या जगभरात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. या बदलाचा परिणाम विविध घटकांवर होताना दिसत आहे. हवामान बदलाचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता  मर्यादित नाही तर अनेक घटकांवर त्याचा परिणाम होतो. यामध्ये शेती पिकांसह, जंगलाला वणवे लागणं, उष्णतेत मोठी वाढ होणं, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळे, दुष्काळ यासारख्या घटना घडतात. तसेच अनेक वेळा उष्णतेच्या लाटेत जीवितहानी देखील होत आहे. या हवामान बदलाच्या क्षेत्रात काही तज्ज्ञांनी चांगल काम केलं आहे. त्या तज्ज्ञांनी नागरिकांना जागृत करण्याचं काम केलं आहे. यामधील एक नाव म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर. तर दुसरं नाव म्हणजे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी. या दोघांच्या कार्याचा आढावा...


रंजन केळकर हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक आहेत. हवामानशास्त्रातील विज्ञान साध्या आणि सोप्या इंग्रजीत आणि मराठीत ते सातत्यानं मांडत असतात. त्यांनी हवामानाच्या संदर्भात मोठं लिखाण केलं आहे. वेळोवेळी ते शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.


वडील रत्नाकर केळकर यांच्या सल्ल्यानेच रंजन केळकर हवामान खात्यात दाखल


डॉ. रंजन रत्नाकर केळकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबईतील दादर येथील बालमोहन विद्यामंदिर आणि पुण्यातल्या सेंट जॉन्स या शाळांमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. पदार्थविज्ञान आणि त्यातही संशोधनाची विशेष आवड असल्यामुळं शालेय शिक्षणानंतर त्यांनी फर्गसन महाविद्यालय, पुणे येथून पदार्थविज्ञान या विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केले. यानंतर मात्र डॉ. रंजन केळकर आपण पुढे कोणत्या क्षेत्रात काम करावं याविषयी विचार करत होते. यावेळी त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर यांनी त्यांना एक सल्ला दिला. दैनंदिन व्यवहारात प्रतिकूल असणार्‍या एखाद्या परिस्थितीतून किती सकारात्मक विचार करता येतो, हेच या सल्ल्यातून दिसून येते. यासाठीच त्या सल्ल्याची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 


डॉ. रंजन केळकर यांचे वडील अलिबाग येथे राहत होते. त्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांत मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागे. त्या काळी अलिबागमध्ये वीज नसण्याचे प्रमुख कारण, भारतीय हवामानशास्र विभाग म्हणजेच इंडिया मेटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट आय.एम.डी. ही संस्था होती. त्या काळात हवामान वेधशाळा अलिबाग येथे होती. वेधशाळेत भूचुंबकीय मोजमापने होत असत. त्या मोजमापनांवर विद्युत तारांमधून वाहणार्‍या विद्युत ऊर्जेचा परिणाम होत असे व मोजमापनांमध्ये अडथळा निर्माण होत असे; म्हणून अलिबागमध्ये विद्युत ऊर्जा वापरण्यावर बंदी होती. जेव्हा या वेधशाळेमध्ये विद्युत ऊर्जेबाबत फारशी संवेदनशील नसलेली उपकरणे दाखल झाली तेव्हाच, म्हणजे 1950 साली अलिबागमध्ये वीज अवतरली. या सर्व प्रकारामुळे रत्नाकर हरी केळकर यांच्या मनात हवामान खाते आणि त्याच्या कामाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदार्थविज्ञानात एमएस्सी झालेल्या मुलाला, रंजन केळकर यांना, हवामान खात्यात दाखल होऊन संशोधन करण्याविषयी सुचवले. त्यानुसार त्यांनी हवामान खात्यात दाखल होण्याचे ठरवले.


1965 साली आय.एम.डी. येथे वैज्ञानिक साहाय्यक म्हणून रुजू 
 
रंजन केळकर यांनी  1965 साली आय.एम.डी. येथे वैज्ञानिक साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच पीएच.डी.साठी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतरची 38 वर्षे त्यांनी कृषी हवामानशास्त्र, उपग्रह हवामानशास्त्र, पुर्वानुमान सेवा, हवामानविषयक उपकरणे, मान्सून मॉडेलिंग, अशा हवामान खात्याच्या विविध क्षेत्रांत त्यांनी संशोधनाचे कार्य केलं. सेवा कार्याची शेवटची सहा वर्षे त्यांनी हवामान खात्याचे महासंचालक म्हणून कामं पाहिलं. दरम्यान, 1971 साली त्यांना पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी पीएच.डी.साठी 'वातावरणाच्या अभिसरणाशी असलेला विकिरणांचा संबंध' या विषयावर प्रबंध लिहिला. 


संगणकाचा वापर करत निष्कर्ष काढणारा शोधनिबंध


केळकर यांनी, मान्सूनच्या काळात भारतीय भूखंडातून उत्सर्जित होणार्‍या उष्णता-ऊर्जेच्या जास्त तरंगलांबीच्या विकिरणांचे संगणन करुन त्यावर 'इंडियन जर्नल ऑफ मीटिओरोलॉजी अँड जिओफिजिक्स' या जर्नलमधून शोधनिबंध लिहिला. त्या शोधनिबंधाला पुरस्कार देखील प्राप्त झाला. भारताच्या हवामानशास्राच्या इतिहासातील, संपूर्णपणे संगणकाचा वापर करत निष्कर्ष काढणारा, तो पहिलाच शोधनिबंध होता. तसेच डॉ. केळकर यांनी भारतीय मान्सूनसंबंधी तयार केलेले पहिलेच सांख्यिकी प्रारुप तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन, भारत सरकारने त्यांना 1999 ते 2003 या कालावधीत वर्ल्ड मीटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यकारी परिषदेचे सभासद म्हणूनही त्यांची निवड झाली होती. 2003 साली हवामान खात्यातून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या नियामक समितीचे, तसेच इस्रोच्या अवकाशशास्त्र सल्लागार समितीचे सदस्यपद आणि वसुंधरा ट्रस्टचे विश्वस्तपदही स्वीकारले.


हवामानबदलामुळे मान्सूनवर विपरित परिणाम होतो आणि दुष्काळ पडतो असं म्हटलं जातं. पण हवामान बदलामुळं महापूर देखील येतो. जेव्हा आपण हवामान बदल म्हणतो तेव्हा त्याला परिस्थितीही कारणीभूत असते. शेतकरी शेतीच्या पद्धतीही बदलत आहेत. हवामान बदलाबरोबर आपण जे इतर बदल केले आहेत तेही ध्यानात घेतले पाहिजेत अशी माहितीही वेळोवेळी केळकर यांनी दिली आहे.


जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे हवामन क्षेत्रातील योगदान


ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे देखील हवामान विभागात मोठे काम आहे. सातत्याने शेतकऱ्यांना, नागरिकांना जागरुक करत असतात. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) या संस्थेत कुलकर्णी यांनी 1973 ते 2010 या 37 वर्षांच्या कालावधीत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. यूके मेट ऑफिसच्या हेडली सेंटरमध्ये ब्रिटिश कौन्सिल फेलो म्हणूनही त्यांनी काम केले. ढगांची रचना आणि पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असणारी नेमकी स्थिती या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) वेदर मॉडिफिकेशन या विषयाच्या तज्ज्ञ समितीतही त्यांची  निवड झाली होती. 


कृत्रिम पाऊस कसा पाडतो यासंबंधीचा अभ्यास करणारा काईपिक्स हा प्रकल्प उभारला


आयआयटीएममध्ये ग्लोबल मॉडेलिंग डिव्हिजन सुरु करण्यात जीवनप्रकाश कुलकर्णी सहभागी होते. याच उपक्रमाचा पुढे विस्तार होऊन 'राष्ट्रीय मान्सून मिशन'ला सुरुवात झाली. ढगांच्या रचनेचा अभ्यास करून कृत्रिम पाऊस कसा पाडता येईल, यासंबंधी अभ्यास करणारा काईपिक्स हा प्रकल्प आणि महाबळेश्वर येथे क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी उभारण्याची संधी मला मिळाली. कोयना प्रकल्पासाठी पूरनियंत्रण करणारे मॉडेल मी विकसित करुन दिले. तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये राबवल्या जाणाऱ्या कृत्रिम पावसाच्या उपक्रमांना त्यांनी शास्त्रीय मार्गदर्शन केले.


भारतातील हवामानशास्त्राच्या विकासात जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे योगदान


हवामानाच्या अंदाजासाठी IITM मध्ये हवामान आणि जागतिक मॉडेलिंग विभागाची स्थापना
पावसात एरोसोलची भूमिका समजून घेण्यासाठी CAIPEEX चा राष्ट्रीय प्रयोग केला.
क्लाउड सीडिंगची प्रक्रिया आणि परिणामकारकता यावर अभ्यास
हाय-अल्टीट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी (एचएसीपीएल) च्या स्थापनेशी संबंधित
महाबळेश्वर येथे ढगांच्या संरचनेचा अभ्यास (2009-2013).


अनेक देशांना भेटी  


यूएस, यूके (ब्रिटिश कौन्सिल फेलो म्हणून यूके मेट डिपार्टमेंटला भेट दिली), इस्रायल,
थायलंड, इंडोनेशिया, इटली, जपान, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, भूतान या देशांना भेटी दिल्या आहेत.


विविध लेखांद्वारे समाजामध्ये हवामानशास्त्राविषयी जागरुकता वाढवण्याचे काम जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले. शाळा महाविद्यालयामध्ये त्यांनी हवामान या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. रोटरी, लायन्स क्लब, टीव्ही चॅनल इत्यादीवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. हवामान अंदाज, हवामान बदल, क्लाउड सीडिंग, क्लाउड बर्स्ट यावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. सामाजिक आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून गावपातळीवर त्यांनी पर्जन्यमापनाचा उपक्रम सुरु केला आहे. हवामानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेट हवामान रेडिओ स्टेशनची स्थापना केली. पश्चिम घाट पर्वतीय भागात भूस्खलनाचा अंदाज प्रणाली विकसित करण्यात त्यांचे योगदान आहे. शाळा शाळांमध्ये जाऊन हवामान केंद्र उभा करण्याचे काम ते करत आहेत. हवामानाच्या नोंदी कशा घ्यायच्या याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक शाळेत हवामान केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस त्यांचा मानस आहे. 


दोन पुस्तकांचे लिखाण


Cloud seeding for rain enhancement, Science, and guidelines for operational
programs.


Weather Messenger for school children and weather enthusiast.


पुरस्कार


B.N. देसाई पुरस्कार  
IITM रौप्य महोत्सवी पुरस्कार


महत्त्वाच्या बातम्या: