मुंबई : स्थापनेपासून झारखंडला अस्थिर सरकारचा शाप होता. गेल्या 14 वर्षात या राज्याने 8 मुख्यमंत्री पाहिले. 81 जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमताला 41 जागा लागतात. 2014 साली पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. ऑल झारखंड स्टुडंट युनियन म्हणजेच आजसूला सोबत घेऊन आणि नंतर झारखंड विकास मोर्चा फोडून भाजपने स्थिर सरकार दिलं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे राजकीय आणि सामाजिदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री न देता जातीय समीकरणात न बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं तसंच आदिवासी बहुल झारखंडमध्ये बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग भाजपने केला.


भाजपचे रघुबर दास हे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री ठरले. मात्र पाच वर्षात हळुहळू पक्षांतर्गत वाद, धोरणातील चुकलेले निर्णय,स्थानिक पातळीवरील मुद्द्यांकडे झालेलं दुर्लक्ष, मोदी शाहांवर अति अवलंबून राहणं, पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांची उपेक्षा आणि आयारामांना मान अशा महाराष्ट्राप्रमाणेच घटना घडत गेल्या आहेत.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इतकं साम्य की रघुबर दास यांनी आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट वाटप केल्याचा आरोपही झाला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खडसे, तावडे, बावनकुळे अशा जुन्या नेत्यांची तिकीटं कापली त्याचप्रमाणे झारखंडमध्येही 37 पैकी 13आमदारांना भाजपने तिकीट नाकारलं. ज्यामध्ये सरयू राय यांच्यासारख्या अत्यंत अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या नेत्यांचा समावेश होता.

सरयू राय म्हणजे 1962 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. झारखंडमधील भ्रष्टाचार विरोधी चेहरा. राय यांच्यामुळे किमान तीन घोटाळे उघडकीस आले. जगन्नाथ मिश्रा, लालुप्रसाद यादव आणि मधु कोडा या तीन माजी मुख्यंमत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली यावरुन त्यांच्या लढ्याचं महत्वं लक्षात येईल.अशा राय यांचंच तिकीट रघुबर दास यांनी कापलं.

राय यांनी रघुबर दास यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणंही बाहेर आणली. अगदी पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या कानावरही घातली पण त्याचाही फार फायदा झाला नाही.या सगळ्या घडामोडींमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला आणि त्याचाच फटका भाजपला राज्यभर बसला असं बोललं जातंय.

सरयू राय यांनी बंडखोरी केली. जमशेदपूर पश्चिम या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून लढण्याऐवजी त्यांनी थेट मुख्यमंत्री रघुबर दास यांना आव्हान दिलं. ज्या जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून रघुबरदास 70 हजार मतांनी निवडून आले होते. तिथेच सरयू राय उभे राहिले विशेष म्हणजे त्यांना झामुमो आणि राजदनही पाठिंबा दिला.

ही बातमी लिहित असताना सरयू राय साडे सात हजार मतांनी आघाडीवर होते. एबीपी न्यूजसोबत बोलताना 68 वर्षांच्या सरयू राय यांनी भाजपच्या पराभवाचं सटीक विश्लेषण केलं. मुख्यमंत्री रघुवर दास यांची मनमानी, स्थानिक मुद्दे आणि स्थानिक नेत्यांना डावलणं, मोदी शाहांवर अति अवलंबून राहणं, कार्यकर्त्यांमधील निरुत्साह आणि मतदाराला गृहित धरणं भाजपला महागात पडलं असं सरयू राय सांगतात.

भाजपच्या नेतृत्वाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर आत्ताच्या पेक्षा बरी अवस्था असली असती असं राय सांगतात. भाजपने केलेल्या चुका काँग्रेसने टाळल्या आणि झारखंड मुक्ती मोर्चा तसंच राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत युती केली. झामुमोला 43, राजदला 7 जागा देत स्वत: 31 जागी लढली. राम मंदिर तसंच नागरिकता सुधारणा कायदा अशा राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपच्या जाळ्यात न अडकता स्थानिक मुद्द्यांवर भर दिला.त्याचा फायदा काँग्रेस महाआघाडीला झाला असं सरळसरळ चित्र दिसतंय.

झारखंडमध्ये पाच टप्प्यांत मतदान झालं. त्यापैकी तीन टप्प्यातील मतदान नागरिकता सुधारणा कायदा संमत झाल्यानंतर होतं, या टप्प्यातील 48 पैकी 19 जागी भाजप आघाडीवर होतं. या जाळ्यात काँग्रेस महागठबंधन अडकलं असतं तर आत्ता मिळालं तेवढं घवघवीत यश मिळालं नसतं हे लक्षात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा दिल्ली काबीज केली. त्याला आठ महिने होत आहेत, या आठ महिन्यात तीन राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यापैकी हरियाणात भाजपची पिछेहाट झाली पण कशीबशी सत्ता राखली.

महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या पण युतीत लढलेल्या शिवसेनेला सांभाळता न आल्यानं महाराष्ट्रासारख्या राज्याची सत्ता हातची गेली. आता झारखंड गमावलं आहे. काँग्रेस- 14, झामुमो-29, राजद- 4 ही महाआघाडी 47 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवेल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे आता जवळपास स्पष्ट आहे.

भाजपने ज्या चुका महाराष्ट्रात केल्या त्याच थोड्याबहुत फरकाने झारखंडमध्ये केल्या आणि आणखी एक राज्यही हातचं घालवलं आहे. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. मोदी-शाहांना तुम्ही हरवू शकता हा संदेश महाराष्ट्राने देशाला दिला, त्याचा परिणाम हळुहळू इतर राज्यात दिसू लागला आहे.