Jharkhand Election Results 2019: रांची : महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या सर्व 81 जागांचे कल हाती आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राजद यांची सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यंदा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आजसूला 3, झारखंड विकास मोर्चा 4 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.


2014 मध्ये 37 जागा जिंकून आजसूसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने यंदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने 34 टक्के मतांसह राज्यात सर्वाधिक मतं मिळवली, पण आघाडी म्हणून  झामुमो आणि काँग्रेसने सत्ता काबीज केली. मुख्यमंत्री रघुवर दास यांचं कामकाज जनतेला आवडलेलं नाही. याशिवाय बिगर-आदिवासी मुख्यमंत्री असल्याने सामाजिक समीकरणही भाजपविरोधात गेल्याचं म्हटलं जात आहे.

झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बहुमतासाठी 41 जागांची गरज आहे. खरंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचा भाजपला विश्वास होता. मात्र काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीने सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे.

एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचा अंदाज
दरम्यान मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र कलांमध्ये दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-जेएमएम आणि राजदला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एबीपी आणि सीवोटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 32, महाआघाडी 35, जेव्हीएम 3 आणि आजसू 5 आणि इतर 6 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Jharkhand Election Results: रघुवर दास पुन्हा येणार की काँग्रेस-जेएमएम आघाडीचा विजय होणार?