Arunachal Pradesh News : भारत-चीन सीमेवर वाढत्या तणावादरम्यान चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे. अरुणाचल प्रदेशातील भारताच्या भूभागावर चीन आपला दावा करत आहे. त्यामुळे भारत आणि चीनचे लष्करही आमनेसामने आले आहेत. त्याचवेळी चीन आपल्या कारवायांपासून परावृत्त होताना दिसत नाही. अरुणाचल प्रदेशात घुसून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने एका भारतीय तरुणाचं अपहरण केल्याचं वृत्त आहे.


अरुणाचल प्रदेशचे भाजप खासदार तापीर गाओ यांनी सांगितलं की, "हे अपहरण सियांग जिल्ह्यातील लुंगटा जोर भागातून झालं आहे. जिथे चीनने 2018 मध्ये भारतात 3-4 किमीचा रस्ता तयार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने बिशिंग गावातून 17 वर्षीय मीरम तारणचं अपहरण केलं आहे. भाजप खासदार तापीर गाओ तसेच काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी भारत सरकारकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे.



चीनच्या पीएलएनं अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाचं भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. चिनी लष्कर पीएलएच्या ताब्यातून पळून आलेल्या आणखी एका मुलानं स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. सध्या अरुणाचलचे खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री निशीथ प्रामणिक यांना चिनी सैन्याने एका मुलाचे अपहरण केल्याची माहिती दिली आणि सरकारी यंत्रणांनी या मुलाची लवकर सुटका करण्याची विनंती केली.


अरुणाचल प्रदेशातील सीमा विवादादरम्यान चीनने अलीकडेच आणखी 15 ठिकाणांसाठी चिनी अक्षरं, तिबेटी आणि रोमन अक्षरांची नावं जाहीर केली आहेत. याबाबत भारतानं अत्यंत परखड प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यावर सांगितलं की, "चीनने अरुणाचल प्रदेश राज्यातील ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. चीनने एप्रिल 2017 मध्येही अशा नावांची मागणी केली होती." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा