दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. एक है तो सेफ है चे पहिले उदाहरण महाराष्ट्रात दिसले आणि आज दिल्लीत दिसल्याचे फडणवीस म्हणाले.
CM Devendra Fadnavis on Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल 27 वर्षानंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. या दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक है तो सेफ है चे पहिले उदाहरण महाराष्ट्रात दिसले आणि आज दिल्लीत दिसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मतविभाजनामुळं भाजपला 12 जागांवर पराभव पत्करावा लागल्याचे फडणवीस म्हणाले.
दिल्लीत भाजप 48 जागांवर आघाडीवर
सध्याच्या कलानुसार भाजपने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
केजरीवालांसह मनिष सिसोदियांचाही पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.
महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्याकडून मोठा जल्लोष सुरु
दिल्ली निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्याकडून मोठा जल्लोष सुरु करण्यात आला आहे. ढोल ताशा वाजवत तसेच अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप देखील सुरु आहे.
अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप
भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला. आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांना भाजपने थेट लक्ष्य केले. या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे दोन्ही नेत्यांवर तुरुंगावारीची वेळ आली. या सगळ्यामुळे इतके दिवस स्वच्छ प्रतिमा असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या कारकीर्दीला कलंक लागला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बुथ स्तरावर जाऊन केलेले मायक्रो प्लॅनिंगही तितकेच परिमाणकारक ठरले.























