नवी दिल्ली: बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.


रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमात झाल्याचं अमित शाह म्हणाले.

सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत.

"कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं" अमित शाह म्हणाले.

कोण आहेत रामनाथ कोविंद?

  • रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.

  • कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण

  • 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.

  • 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती

  • भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं

  • भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

  • 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत


रामनाथ कोविंद यांचा अल्पपरिचय

रामनाथ कोविंद यांचा जन्म कानपूरमधील डेरापूर तालुक्यातील परौख गावात झाला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.

1977 मध्ये जनता पार्टीचं सरकार आलं, त्यावेळी ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सचिव होते. त्याचवेळी ते भाजप नेतृत्त्वाच्या संपर्कात आले.

घाटमपूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

रामनाथ कोविंद यांनी 1990 मध्ये भाजपच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

पण पक्षाने त्यांना 1993 आणि 1999 मध्ये उत्तर प्रदेशातून दोनवेळा राज्यसभेवर पाठवलं होतं.

भाजपचा दलित चेहरा म्हणून कोविंद परिचीत होते. कोविंद हे भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते होते.

आयएएस परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश

कोविंद यांचं प्राथमिक शिक्षण खानपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. त्यांनी डीएव्ही कॉलेजमधून बी कॉम आणि कायद्याची पदवी घेतली.

यानंतर त्यांनी दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. तिसऱ्याच प्रयत्नात त्यांनी या परीक्षेत यश मिळवलं.  मात्र मुख्य प्रवाहातील नोकरी न मिळाल्याने त्यांनी नोकरी नाकारली.

स्वत:चं घर दान

कोविंद यांना तीन भाऊ आहेत. ते सर्वात लहान. त्यांच्या परौख गावात वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेलं घर त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान दिलं आहे.

राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया

राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल.

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

लोकसभेतले 543
राज्यसभेतले 233

असे एकूण 776 खासदार मतदान करतात

प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो)

देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120

म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college)

…………….

आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते

उदा. महाराष्ट्र

महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235

5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख) भागिले 288

याचं उत्तर येतं 1,75,042

(288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत)

एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042

त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175 ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत

यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे

…………….

यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे
…………….

राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882

( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474)

…………….

बहुमतासाठी आकडा : 5,49,442
…………….

पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती

पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे

शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनच आहे

शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868

अधिक

63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025

अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत

शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात

…………….

ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील

…………

बीजेडी सोबत आल्यास काय

बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार

27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं

तर 117 आमदार आहेत

एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे

117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत.

दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते

……………

एआयडीएमके सोबत आल्यास काय?

एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत

म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत

तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत

तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे

134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत

दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल.

एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे