पाटणा : बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमध्ये आज (14 सप्टेंबर) मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाव (Boat) बागमती नदीत उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त नावेत 34 विद्यार्थी होते. त्यापैकी 18 विद्यार्थी बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. 


इतकी भीषण दुर्घटना होऊनही,  इथे मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा जास्त अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला. सध्या एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, शोध आणि बचावकार्य सुरु आहे. 






नेमकं काय घडलं? 


मुजफ्फरपूरमध्ये गुरुवारी सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या नावेत 34 विद्यार्थी होते. बागमती नदीतून जाताना अचानक नाव डळमळू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर ही नाव उलटली. स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी सांगितलं की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवलं होतं. यामुळेच नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर बोट डळमळू लागली. यानंतर बोट अनियंत्रित होऊन उलटली. नाविक आणि त्याच्या सहकाऱ्याने आधी काही मुलांना वाचवलं. यानंतर स्थानिक लोकांनीही नदीत उडी घेतली आणि काही मुलांना बाहेर काढलं. उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे.  


"ही घटना आज सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली," अशी माहिती मुझफ्फरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.


सरकारकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना मदत देणार : मुख्यमंत्री नितीश कुमार


या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. या अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून मदत दिली जाईल," असं आश्वासन नितीश कुमार यांनी दिलं.






बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांचा आक्रोश


दरम्यान या घटनेनंतर नदीकिनाऱ्यावरील मधुरपट्टी घाटाजवळ शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. नदीकिनारी बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरु आहे. बेपत्ता मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.


हेही वाचा


Bihar Firing : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार; भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद