औरंगाबाद : यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सरकारनं हे अॅप तयार केलेलं आहे. पण याच अॅपचा फायदा घेऊन औरंगाबादच्या 1 हजार 214 बँक खात्यांमधून तब्बल 9 कोटी 43 लाख रुपये लांबवण्यात आले आहेत. यासाठी औरंगाबाद शहरातील 800 बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे.


आरोपींनी यूपीआयच्या मदतीनं मोठमोठ्या अकाऊंट्सवर डल्ला मारला. त्यासाठी गोरगरीबांची जनधन, स्कॉलरशिप आणि  झिरो बॅलन्स अकाऊंट असणारे ग्राहक आणि त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारण्यात आला आहे. यूपीआय घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत मुकुंदवाडी आणि सिडको पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत संशयास्पद व्यवहार झालेली 400 अकाऊंट्स होल्ड करण्यात आली आहेत.

देश कॅशलेस करण्यासाठी मोदी सरकारनं यूपीआय आणि त्याचं अपडेटेड व्हर्जन असलेलं भीम अॅप आणलं. पण त्यात तांत्रिक त्रुटी राहिल्या. शिवाय मोबाईल आणि ई व्यवहारांचं लोकशिक्षण आपल्याकडे म्हणावं तितकं झालेलं नाही. त्यामुळेच तुमची-आमची बँक अकाऊंट्स आणि बँक बॅलन्स धोक्यात आहे.

यूपीआय अॅपच्या माध्यमातून कशी झाली लूट?

बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडला.

मोबाईलमध्ये बँकेचं अॅप इन्स्टॉल केलं.

अॅपमधून पैसे मागितले.

पैसे मागितल्याची रिक्वेस्ट गेली.

रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर पैसे खात्यात जमा होणं अपेक्षित होतं.

पण तांत्रिक त्रुटींमुळे पैसे जमा झाले नाहीत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे प्रत्येक बँकेचं खातं आहे.

तांत्रिक त्रुटींमुळे पैसे तिथे जमा झाले.

अशा प्रकारे जर आपली फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर काय कराल?

आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीच्या हाती देऊ नका.

कुणाशीही आपल्या मोबाईलचे पासवर्ड शेअर करु नका.

मोबाईलमधील अॅप कायम लॉक राहतील याची काळजी घ्या.

क्रेडिट, डेबिट कार्डचे पासवर्ड कुणालाही देऊ नका.

फोनवरुन ई-व्यवहार करताना पासवर्ड कुणाला कळणार नाही याची काळजी घ्या.

आपलं बँक खातं आणि अकाऊंटमधील बॅलन्स वरचेवर तपासून घ्या.