पणजी : गोव्यात चित्रित झालेल्या मलंग या हिंदी सिनेमामधून गोव्याची चुकीची प्रतिमा रगंवण्यात आली असल्याबद्दल सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील त्याची गंभीर दाखल घेतली आहे. आज वन भवनाच्या लोकर्पणानंतर पत्रकारांनी याबाबत प्रश्न केला तेव्हा कालच हा विषय माझ्या लक्षात आला. त्याची गंभीर देखल घेण्यात आली आहे. यापुढे ईएसजी अर्थात गोवा मनोरंजन संस्थेमार्फत चित्रिकरणाची परवानगी देताना त्याची स्टोरी पाहिली जणार आहे. स्टोरीमधून गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे, असे दिसून आले तर संबंधितांना गोव्यात सिनेमाचे चित्रीकरण करण्यास परवानगी मिळणार नाही.


साडे चारशे वर्षे पोर्तुगिजांची राजवट असलेल्या गोव्यातील राहणीमानावर पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आहे .इथले निळेशार समुद्र, सुरुची बने, हिरवेगार डोंगर, पांढरी शुभ्र चर्चिस, गोव्याचे वैभव दर्शवणारी देखणी मंदिरे, खळखळून वाहणारे धबधबे अशी निसर्ग संपदा असल्याने देशभरामधील निर्माते चित्रीकरणासाठी गोव्याला पसंती देत असतात. शिवाय मुंबई आणि टॉलीवूडपासून गोवा हे सर्वात जवळ असल्याचा फायदा निर्माते उठवत असतात. अनेक गाजलेल्या सिनेमांचे चित्रीकरण गोव्यात झालेले आहे. रोहित शेट्टी यांनी तर गोव्यातील बहुतेक ठिकाणे आपल्या सिनेमामधून जगप्रसिद्ध केली आहेत. मात्र दम मारो दम, गो गोवा गॉन सारख्या काही सिनेमात गोव्याचा आलेला संदर्भ स्थानिक लोकांच्या पसंतीस पडलेला नाही. त्या त्या वेळी यावर आवाज देखील उठवण्यात आलेला आहे. आता मलंगमुळे हिच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.



मलंग मधून गोव्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने आता चित्रीकरणाची परवानगी देण्यापूर्वी त्याची कथा जाणून घेऊन त्यात गोव्याची बदनामी तर होणार नाही ना याची खातरजमा करून घेण्याचे ठरवले आहे.

यापुढे सिनेमात गोवा कसा दाखवला जाणार हे पाहुनच परवानगी दिली जाणार आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यस्था उत्तम आहे. इतर चांगल्या गोष्टी दाखवण्यासारख्या खूप काही असताना गोव्याची ड्रग्स आणि इतर गोष्टी दाखवून चुकीची प्रतिमा रंगवणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री स्वतः इएसजीचे अध्यक्ष आहेत. गोव्यात सिनेमाचे चित्रीकरण करण्यापूर्वी संबंधितांना ईएसजीची परवानगी घेणे बंधनकारक असते. ईएसजीची परवानगी घेतल्याशिवाय गोव्यात सिनेमाचे चित्रीकरण करता येत नाही. त्यामुळे आता एखाद्या सिनेमात गोव्याची प्रतिमा मलिन होईल अशी कथा असेल तर त्यांना चित्रीकरणासाठी गोव्याची दार बंद असणार आहेत.