नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील सर्वात संवेदनशील खटल्याचा निकाल आता दृष्टीक्षेपात आहे. 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु होणार असल्याचे आज (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुन्हा तारीख पे तारीख होत हे प्रकरण लांबणार की तातडीने निकाल लागणार?


सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर 2019 ला निवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टाची जी साधारण परंपरा आहे, त्यानुसार ज्या खंडपीठाकडे प्रकरण येतं, त्याच खंडपीठाच्या कालावधीत निकाल लागतो. त्यामुळे 6 ऑगस्टला हे प्रकरण सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडे आलं तर त्याचा अर्थ त्यांच्या निवृत्तीआधी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर साधारणपणे 100 दिवसांत त्याचा निकाल लागतो. केशवानंद भारती केसमध्ये आजवर सर्वात जास्त काळ सुनावणी चालली. कामकाजाच्या 68 दिवसांमध्ये ही सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर नंबर येतो आधार केसचा, कामकाजाच्या 38 दिवसांमध्ये ही सुनावणी पूर्ण झाली होती.

6 आँगस्ट ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 72 दिवस येतात. सुनावणी प्रत्येक आठवड्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी होणार आहे. त्यामुळे साधारण सुनावणीचे 40 दिवस सरन्यायाधीशांच्या निवृत्तीआधी खंडपीठाला मिळू शकतात.

अयोध्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला होता. त्यानंतर गेल्या आठ-नऊ वर्षात सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातली मोठी घडामोड घडलेली नव्हती. त्यामुळे आता 6 ऑगस्टपासून सुरु होणारी ही सुनावणी देशाला अयोध्या प्रश्नावरचं अंतिम उत्तर कधी देते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.