Amritpal Singh Arrest Operation:  खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) शोध अजूनही सुरू आहे. आठ दिवस उलटून गेले तरी सुरक्षा यंत्रणांना अमृतपालला पकडणं शक्य झालेलं नाही. आधी पटियाला, नंतर हरियाणातील शाहबाद आणि नंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणं बदलतोय. यूपी सीमेवरून ते नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच, उत्तराखंडमधील सीमेवरही यंत्रणांचं बारीक लक्ष आहे. 


नेपाळच्या सीमेला लागून असलेले शेवटचे गाव मेला घाट येथे ठिकठिकाणी लावून तपासणी करत असलेले झनकैया पोलिस स्टेशनचे अधिकरी म्हणाले,  पोलिसांकडून सातत्याने सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची सखोल तपासणी केली जात आहे. यासोबतच ठिकठिकाणी पोस्टर चिकटवण्यात आले असून, या गुन्हेगारांना कोणीही मदत अथवा आश्रय देऊ नये, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे.  मदत किंवा आश्रय देणाऱ्यांवरही कडक कारवाई  करण्यात येणार आहे.


अमृतपालच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु 


खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं. पोलिसांनी अमृतपालला पकडण्यासाठी शोधमोहिम राबवली असून ही मोहीम सुरूच आहे. पोलिसांनी अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे. अमृतपाल सिंह अद्यापही फरार असल्याचं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे.


Who is Amritpal Singh : कोण आहे अमृतपाल सिंह?


'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह यांचा जन्म 1993 मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. अमृतपाल तरसेम सिंह यांचा मुलगा आहे. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो 10 वर्षे म्हणजे 2022 पर्यंत दुबईत राहिला. यादरम्यान त्याचे केस आणि चेहऱ्यावर दाढी वाढवलेली नव्हती.


2022 मध्ये दुबईहून भारतात परतला


अमृतपाल सिंहच्या काकांचा दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला होता. तो ऑगस्ट 2022 मध्ये दुबईहून भारतात आला होता. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक्रम केला. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरू केली. खलिस्तानी चळवळीत ग्रामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली.