हैदराबाद: राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या विशेष कोर्टाने 2007 मधील मक्का मस्जिद स्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं आहे.


या आरोपींविरोधात एनआयएला कोर्टासमोर ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं.

बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू

18 मे 2007 रोजी झालेल्या या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. नमाजावेळी ऐतिहासिक मक्का मस्जिदेत हा स्फोट घडवण्यात आला होता. यामध्ये 9 ठार तर 58 जण जखमी झाले होते.

सुरुवातीच्या तपासानंतर हा खटला सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.

10 आरोपी

या स्फोटाप्रकरणी सीबीआयने एक आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये या खटल्याचा तपास एएनआयकडे सोपवण्यात आला.

या स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंदसह 10 जणांवर आरोप होता. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

कोण कोण आरोपी?

  1. स्वामी असीमानंद

  2. देवेंद्र गुप्ता

  3. लोकेश शर्मा (अजय तिवारी)

  4. लक्ष्मण दास महाराज

  5. मोहनलाल रातेश्वर

  6. राजेंद्र चौधरी

  7. भारत मोहनलाल रातेश्वर

  8. रामचंद्र कलसांगरा (फरार)

  9. संदीप डांगे (फरार)

  10. सुनील जोशी (मृत)


स्वामी असीमानंद यांचा कबुलीनामा

स्वामी असीमानंद यांनी 2011 मध्ये सत्र न्यायालयात दिलेल्या जबाबात, अजमेर दर्गा, हैदराबादचं मक्का मस्जिद आणि अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली होती. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला जबाब फिरवला होता. त्यावेळी त्यांनी एनआयएने जबरदस्तीने आपल्याकडून हवं तसं वदवून घेतल्याचा दावा केला होता.

असीमानंदांवर आरोप

असीमानंदांवर 2006 आणि 2008 मध्ये ‘समझोता एक्स्प्रेस’ स्फोट (फेब्रुवारी 2007), हैदराबाद मक्का मस्जिद स्फोट (मे 2007), अजमेर दर्गा (ऑक्टोबर 2007) आणि मालेगांवमधील दोन स्फोट (सप्टेंबर 2006 आणि सप्टेंबर 2008) या स्फोटांचे आरोप होते. या सर्व स्फोटांमध्ये सुमारे 119 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी असीमानंद यांना अजमेर दर्गा स्फोटप्रकऱणी निर्दोष ठरवण्यात आलं होतं.

कोण आहेत असीमानंद?

असीमानंदांनी आपलं तरुणपण संघाच्या आदिवासी कल्याण आश्रममध्ये घालवलं. त्यांनी जेव्हा स्फोटाचा कट रचला (त्यांच्यावर आरोप आहे) तेव्हा ते आदिवासी कल्याण आश्रमाचे, धार्मिक विंग जागरण विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. त्यांच्यासाठी हे पद खास तयार करण्यात आलं.

2005 मध्ये एम एस गोलवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त असीमानंद यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. असीमानंदांना विशेष गुरुजी सन्मान देण्यात आला. या सन्मानासोबत त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. या गौरव सोहळ्यात भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी व्याख्यान दिलं.

मात्र असीमानंदांवर आरोप होऊनही त्यांना दिलेला सन्मान, ना संघाने ना भाजपने, परत घेतला.

संबंधित बातम्या

असिमानंद आणि रिपोर्टची मुलाखत (ऑडिओ)

अजमेर स्फोट प्रकरण, असीमानंद यांची निर्दोष मुक्तता, 3 जण दोषी

मोहन भागवंताच्या संमतीनेच देशभरात पाच स्फोट, असिमानंदचा 'कॅरावन'कडे दावा