नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन भारत-चीन दरम्यान तणावाचं वातावरण असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनमध्ये या महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी अजित डोभाल चीन दौऱ्यावर जातील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


दुसरीकडे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही डोकलाम मुद्द्याची माहिती लोकसभेत दिली. दोन्हीही देशांमध्ये चर्चा व्हावी, यासाठी आपापलं सैन्य मागे घ्यावं, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.

‘डोकलाम’ भारत-चीन-भूतानचं ट्रायजंक्शन

सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सूत्रांच्या मते, चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.

संबंधित बातम्या

… तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

ट्रम्प यांना खुश करण्यासाठी भारतीय सैन्यदलाची घुसखोरी, चिनी मीडियाची आगपाखड

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’