Rice and Pulses News : शेतकऱ्यांसह (Farmers) देशातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यानं डाळी (Dal) आणि तांदळाच्या (Rice) उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय. त्यामुळं येत्या काही महिन्यांत सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) चिंता करावी लागणार नाही. डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळं देशातील 70 कोटी जनतेला दिलासा मिळणार आहे. 


मागील वर्षी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली होती. देशाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने निर्यातीवरही बंदी घातली होती. अशीच स्थिती डाळींमध्येही दिसून आली. आता मात्र, डाळ आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. देशातील सुमारे 70 कोटी म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तांदळावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भाताच्या उत्पादनात झालेली अंदाजे वाढ ही अशा लोकांसाठी चांगली बातमी आहे. 


भात लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ


मान्सूनच्या चांगल्या पावसामुळं चालू खरीप हंगामात (उन्हाळी पेरणी) भात पिकाखालील क्षेत्रात आतापर्यंत 7 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर भाताचे क्षेत्र 166.06 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत 155.65 लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. याचा अर्थ येत्या काही महिन्यांत तांदळाचे उत्पादन वाढल्याने भावावर लक्षणीय परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार नाही. भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 70 कोटी म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक लोक तांदळावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तांदळाचे भाव वाढल्याने अशा लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता देशात तांदळाचे उत्पादन वाढले तर सर्वसामान्यांना कमी दरात तांदूळ उपलब्ध होईल.


डाळींचे उत्पादनही वाढणार


कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2024 पर्यंत खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढीची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढून 85.79  लाख हेक्टर झाले आहे. जे गेल्या हंगामात 70.14 लाख हेक्टर होते. भरडधान्य पेरणीखालील क्षेत्र कमी म्हणजे 123.72 लाख हेक्टर आहे, जे एका वर्षापूर्वी 134.91 लाख हेक्टर होते. या खरीप पेरणी हंगामात अखाद्य श्रेणीतील तेलबियांचे क्षेत्र आतापर्यंत 163.11 लाख हेक्टर आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.91 लाख हेक्टर होते.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! सरकारनं तांदूळ निर्यातबंदी उठवली, 'या' देशाला करणार 14 हजार टन तांदळाची निर्यात