गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल याबाबत म्हणाले की, ''अहमदाबादचे नाव बदलून 'कर्णावती' करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही आणि नागरिकांनी सहकार्य केले तर गुजरात सरकार अहमदाबादचे नाव बदलून 'कर्णावती' ठेवू शकते''.
काय आहे अहमदाबादचा इतिहास
आताचे अहमदाबाद आणि आसपासचा परिसर चालुक्य काळात वसवलेला आहे. ११ व्या शतकात वसलेल्या या शहराला अशवाल या नावाने ओळखले जात होते. चालुक्य घराण्याचा राजा कर्णने अशवालच्या भिल्ल राजाचा पराभव केला. त्यानंतर जवळच असलेल्या साबरमती नदीच्या काठावर नव्याने शहर वसवले. या शहराचे नाव 'कर्णावती' असे होते. अहमद शाहने १४११ साली कर्णावती शहराजवळ आणखी एक शहर वसवले. त्याचे नाव अहमदाबाद ठेवले. असे म्हटले जाते की, अहमदशाहने स्वतःच्या नावावरून या वसवलेल्या शहराला अहमदाबाद असे नाव दिले.