नवी मुंबई: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांमधील भांडणानं उत्तरप्रदेशचं राजकारण बरंच बदललं आहे. याच बदलत्या राजकारणामुळं येथील मतदारांचा आता नेमका कल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सिसरोनं एक तात्काळ सर्व्हे केला आहे.


एबीपी न्यूज आणि सिसरोनं केलेल्या तात्काळ सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदासाठई अखिलेश यादव यांना सर्वाधिक म्हणजेच 31 टक्के पसंती मिळाली आहे. तर मायावती यांना 27 टक्के पसंती मिळाली असून भाजपच्या आदित्यनाथ यांना 24 टक्के पसंती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने पहिले काका पुतण्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सध्या तरी हे भांडणं शमलं असलं तरीही ऐन निवडणुकीच्या वेळेस काय होईल याबाबत काहीही सांगता येणार नाही.

समाजवादी पक्षातील भांडणाचा नेमका फायदा कुणाला?

काका-पुतण्याचा भांडणामुळे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जूनपासून सुरु असलेल्या या सुंदोपसुंदीनं भाजप आणि बसपच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळे या भांडणाचा फायदा घेण्यासाठी भाजप आणि बसपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

एबीपी न्यूज आणि सिसरोनं केलेल्या सर्व्हेमध्ये  उत्तरप्रदेशमधील मतदारांना विचारालं की, या भांडणाचा फायदा कुणाला मिळेल? सर्व्हेचा निकालानुसार सध्या भाजपला फायदा मिळू शकतो. भाजपला 39 टक्के आणि बसपला 29 टक्के फायदा मिळू शकतो. सगळ्यांच्या भांडणात काँग्रेसलाही फायदा मिळेल पण अवघे सहा टक्के.

उत्तरप्रदेशमधील पुढचा मुख्यमंत्री कोण असायला हवं?

एबीपी न्यूज-सिसरोच्या तात्काळ सर्व्हेनुसार अखिलेश यादवांना दिलासा मिळाला आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हवा? यावप मतदारांनी अखिलेश यादवांना 31 टक्के पसंती दिली आहे. मायावतींना 27 टक्के पसंती आहे. तर भाजपच्या आदित्यनाथ यांना 24 टक्के पसंती मिळाली आहे. या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री पदासाठी अखिलेश यादव यांना सर्वाधिक पसंती आहे.

भांडणामुळे मुलायम कुटुंबातील कोणाची प्रतिमा मलिन झाली?

या प्रश्नावर 43 टक्के मतदारांच्या मते, दोघांची प्रतिमा मलिन झाली आहे. तर 30 टक्के मतदारांच्या मते मुलायम सिंह यांची प्रतिमा खराब झाली आहे. तर अवघ्या 16 टक्के मतदारांना वाटतं की, अखिलेश यादव यांची प्रतिमा खराब झाली आहे.

अखिलेश यांनी वेगळा पक्ष काढायला हवा?

उत्तरप्रदेशच्या मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादवांना पसंती दिली आहे. पण त्यांनी वेगळा पक्ष काढावा का? यावर तब्बल 55 टक्के मतदारांना वाटतं की, त्यांनी वेगळा पक्ष काढू नये. तर 19 टक्के लोकांना वाटतं की, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा.

समाजवादी पक्षातील भांडणाला जबाबादार कोण?

काका-पुतण्याच्या भांडणातून समाजवादी पक्षात भांडणं सुरु झाली. या दोघांच्या मध्ये पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव हे होते. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचं अध्यक्ष होण्यावरुन या दोघांमध्ये भांडण सुरु आहे. जर काम आपण केलं आहे तर उमेदवार निवडण्याचा अधिकार देखील आपल्यालाच मिळायला हवा असं अखिलेश यांचं म्हणणं होतं. पण मुलायम यादवांनी हा अधिकार शिवपाल यादवांना दिला. त्यानंतर अखिलेश यादवांनी त्यांच्याकडून महत्वाची खाती काढून घेतली. शिवपाल यांना सरकारनं बरखास्त केलं. उत्तरप्रदेशच्या मतदारांचंही म्हणणं तेच आहे की, चूक शिवपाल यांनीच केली होती. 43 टक्के लोकांचं म्हणणं देखील तेच आहे.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी अमरसिंह यांनी घरात आग लावल्याचं म्हटलं आहे. पण 15 टक्के लोकांना वाटतं की, अमरसिंह हे या भांडणाला कारणीभूत आहेत. तर तीन टक्के लोकांना वाटतं की, मुलायम सिंह यांचे चुलत भाऊ रामगोपाल यादव हे भांडणाला जबाबदार आहेत. तर दुसरीकडे एक टक्के लोकांना वाटतं की, मुलायम सिंह यादवांची दुसरी पत्नी साधना गुप्ता या भांडणाला कारणीभूत आहेत.

कसा करण्यात आला सर्व्हे?

26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या तात्काळ सर्व्हेमध्ये आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, उत्तरप्रदेशमधील लोकं नेमका काय विचार करीत आहेत. हे जाणून घेण्यासाठी उत्तरप्रदेशमधील 5 विधानसभा मतदारसंघातील 1500 लोकांची मतं आम्ही जाणून घेतली. हा तात्काळ सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अॅण्ड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या दिशानिर्देशाचं पालन करुनच करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशात यादव पिता-पुत्राचे एकमेकांवर 'सपा'सप वार!