इटानगर : देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष उत्तर प्रदेशाकडे लागलं असतानाच, तिकडे अरुणाचल प्रदेशात मोठी उलथापालथ झाली आहे. कारण सत्ताधारी पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून निलंबित केलेले मुख्यमंत्री पेमा खांडू, यांच्यासह एकूण 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


त्यामुळे 60 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 11 अधिक 33 असे मिळून 44 आमदार झाल्याने, भाजपने आता सत्ता स्थापन केली आहे. याशिवाय दोन अपक्षांनीही भाजपची कास धरली आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनीही ट्विट करुन अरुणाचलमध्ये आता भाजपने सरकार स्थापन केल्याचं म्हटलं आहे.

सत्ताधारी पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे (पीपीए) 43 आमदार होते, मात्र त्यापैकी एक-दोन नव्हे तर 33 आमदार हे पेमा खांडू यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झाल्याने, पीपीए सत्तेतून पायउतार झाली आहे.

अरुणाचल प्रदेशातील राजकीय वाद

गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशात राजकीय वाद धुमसत होता. मात्र या वादाला गुरुवारी तोंड फुटलं. पीपीएचे अध्यक्ष काहफा बेंगिया यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत, मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चौवना मेन आणि पाच आमदारांना पक्षातून निलंबित केलं.

इतकंच नाही तर नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक -पीपीए आघाडीने कालच टकाम पेरियो यांना अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं.

मात्र राजकीय समीकरणं तेव्हा बदलली, जेव्हा पेरियांना साथ देणारे आमदार खांडूंच्या ताफ्यात गेले. त्यामुळे पीपीएने आज पुन्हा चार आमदारांचं निलंबन केलं.

अखेर खांडू यांनी पीपीएलाच धक्का देत, भाजपमध्ये प्रवेश केला आणि सरकार स्थापन केलं.